पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वडगाव सावताळ, वासुंदे, खडकवाडी, कासारे, वनकुटे, कामटवाडी आणि पोखरी या गावांमध्ये वीट व्यवसाय हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, सध्या अवकाळी पावसाने या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीट तयार करणाऱ्या शेतांमध्ये पाणी साचले असून, कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामुळे वीट व्यवसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या भागात वीट व्यवसायातून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. पावसामुळे विटांचे उत्पादन ठप्प झाले असून, तयार विटांचा दर्जा खालावला आहे. याचा परिणाम बाजारपेठेतील मागणीवरही झाला आहे. स्थानिक व्यवसायिकांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. विटांचे उत्पादन, वाहतूक आणि विक्री यावरही मर्यादा आल्या आहेत.
काही व्यवसायिकांनी कर्ज काढून गुंतवणूक केली होती, परंतु नुकसानामुळे त्यांची परतफेड करण्याची क्षमता धोक्यात आली आहे.या संकटातून सावरण्यासाठी वीट व्यवसायिकांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अवकाळी पावसामुळे विटांचा दर्जा खालावला
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या वीट भट्ट्यांमध्ये पाणी साचले आहे. कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तयार विटांचा दर्जाही खालावला आहे. यामुळे आम्हाला लाखों रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
-अशोक खराबी (व्यवसायिक)