जेऊरमधील दुर्घटना | महावितरणच्या दारात करणार अंत्यसंस्कार
अहमदनगर / नगर सह्याद्री –
नगर तालुक्यातील जेऊर येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे दोघांना जीव गमवावा लागला आला आहे. विजेच्या धक्क्याने एका गायीसह शेतकर्यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. पिराजी पांडुरंग पाटोळे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
सविस्तर हकीगत अशी की, विजेची तार गेल्या आठ दिवसांपूर्वी तुटली होती. याबाबत महाविरणच्या अधिकार्यांना कळविले होते. परंतु तरीही महावितरणच्या अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी पिराजी पांडुरंग पाटोळे हे शेतात काम करत होते. तसेच संजय पाटोळे यांची गाय शेतीच्या बांधाला चरत होती. पिराजी यांना काम करत असतांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच गायीलाही विजेचा धक्का बसल्याने गायीचा मृत्यू झाला.
ही दुदैवी घटना घडल्यानंतर जेऊरकरांनी महावितकरण कंपनी विरोधात संताप व्यक्त करत मृत्यू झालेल्या शेतकर्याचा अंत्यसंस्कार जेऊर येथील महावितरण कंपनी कार्यालयाच्या दारात करणार असल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान शेतकर्याचा मृत्यू झालेल्या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांनी कळविण्यात आल्यानंतर पोलिसांंंंनी घटनास्थळाची पाहणी केली.
मयत पिराजी पाटोळे हे जेऊर ग्रामपंचायते १० वर्ष सदस्य होते तर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ते पाच वर्ष सदस्य होते. विजेच्या धक्क्याने पाटोळे यांचा मृत्यू झाल्याचे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.