अहिल्यानगर । नगर सहयाद्री
सर्व आरोप निराधार, तथ्यहीन आणि खोटे आहेत. व्हायरल व्हिडिओ माझ्याच इंस्टाग्राम व फेसबुक अकाउंटवर मी स्वतः पोस्ट केला होता. कुटुंबीय कार्यक्रमात एक मिनिट डान्स केल्यास त्यात चुकीचे काय? असा प्रतिप्रश्न करत चांगल्या कामामुळे काही विरोधक बदनामीचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप करत त्यांनी तृप्ती देसाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी अत्यंत गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिनकर यांनी पदाचे आमिष दाखवून काही महिलांना बिअर बार व धाब्यावर बोलावल्याचा, तसेच नाचायला लावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, नितीन दिनकर यांनी या आरोपांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
तृप्ती देसाई यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ हा कोणताही आक्षेपार्ह प्रकार नसून, भाचीच्या वाढदिवसाचा घरगुती कार्यक्रमातील तो व्हिडिओ माझ्याच इंस्टाग्राम व फेसबुक अकाउंटवर स्वतः पोस्ट केला असल्याचे सांगितले. तसेच, १४ महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ आता पुढे करून स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी तृप्ती देसाई हे बदनामीचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून पक्षसंघटन, समाजसेवा आणि जनसंपर्क यामध्ये प्रामाणिकपणे कार्यरत आहे. पक्षसंघटन बळकट करत असून, विविध सामाजिक आणि विकासकामांमध्ये सक्रिय आहे. राजकीय त्रास देण्यासाठी आणि प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. प्रामाणिक कार्याचा जनतेलाही विश्वास आहे. लवकरच सत्य उजेडात येईल असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राजकारणात आजपर्यंत एकनिष्ठ भूमिका बजावली आहे. केलेले आरोप हे केवळ राजकीय द्वंद्वातून प्रेरित आहेत. महिला सन्मान आणि सुरक्षेची भक्कम भूमिका आजवर राहिली आहे. भूमाता ब्रिगेडकडून वारंवार अशा प्रकारे निवडक लोकांवर आरोप केले जातात. माझ्यावरील आरोपही त्या पद्धतीचा एक भाग असल्याचे ते म्हणाले. सध्या या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, या प्रकरणात सत्य काय आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.