मुंबई / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं चांगलंच झोडपून काढलं होतं. हा पाऊस इतका झाला की मुंबईतील रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात शेत पीकांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र त्यानंतर या पावसानं काहिशी विश्रांती घेतली तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली.
अशातच आता हवामान खात्याकडून राज्याला अलर्ट करण्यात आलं आहे. पुढील २४ तासांत कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, ठाणे येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
यासोबतच मुंबईसह रायगड जिल्ह्याला आज (शनिवार) हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यास रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मान्सून जोरदार सक्रिय झाला असून पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.