कोपरगाव / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर यांनी शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी नेवासा तालुक्यातील करजगाव येथे आपल्या राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर बाचकर यांच्या कुटुंबीयांकडून कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या दोघा अधिकाऱ्यांनी मानसिक आणि आर्थिक छळ केल्यामुळे बाचकरांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देऊन संबंधित गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. बाचकर कुटुंबाच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथे बाजीराव बाचकर तीन वर्षांपासून ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांनी बाजीराव यांना वेळोवेळी विविध कारणाने मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप आहे. या जाचाला कंटाळून त्यांनी जीवन संपवल्याचा दावा केला जात आहे.
याबाबत बाचकर यांच्या मृत्यूनंतर एक सुसाइड नोट कुटुंबीयांना मिळाली आहे. ती सुसाईड नोट सध्या सोनई पोलिसांकडे असल्याची माहिती असून ती बाजीराव बाचकर यांचीच आहे का? याची खात्री सोनई पोलिस करीत आहेत.
दरम्यान, याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता संबंधित ग्रामसेवक 17 जुलैपासून रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. आठ ऑगस्टला त्यांनी विष घेतलं तर आम्ही त्यांचा छळ कसा केला? असे म्हणत त्यांना काय ताणतणाव आला माहीत नाही, मात्र कार्यालयाला कळवलं असतं तर त्यांच्या सहकाऱ्यांनी ताणतणाव दूर केला असता असे म्हणत आरोप फेटाळले आहेत. यावेळी विस्तार अधिकारी वाघमोडे हे कार्यालयात उपस्थित नसताना त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी नेमकं काय छळ केला? या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एखादा ग्रामसेवक थेट एवढी टोकाची भूमिका घेत असेल तर नेमकं काय घडलं असेल? कुटुंबियांच्या सांगण्याप्रमाणे मानसिक आणि आर्थिक छळ केला असेल कशा पद्धतीने त्रास देण्यात आला. कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होणार का? या सर्व गोष्टींची चर्चा होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का? खातेनिहाय चौकशी लागणार का? त्याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.