मुंबई / नगर सह्याद्री –
जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. अजित पवार ४२ आमदारांचा एक गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत रंगला. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. ही लढाई सुप्रिया सुळेंनी जिंकली. मात्र त्यानंतर आलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षाने तुफान यश मिळवलं. तसंच महायुतीला २३७ जागा मिळाल्या. महायुतीचा विजय झाल्यापासूनच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेसह शरद पवार, अजित पवार एकत्र येतील अशाही चर्चा सुरु होत्या. मात्र वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी पक्षातील फुटीबाबत भाष्य केलं.
आपल्या पक्षात फूट पडली आहे पण…-शरद पवार
आपल्या पक्षात फूट पडली, फूट पडावी असं काही वाटत नव्हतं पण फूट पडली. काही मुलभूत विचारांमध्ये फरक झाला आणि फूट पडली. जे राहिले आहेत ते विचारांनी राहिले आहेत. उद्या निवडणुका होतील तेव्हा वेगळं चित्र बघायला मिळेल. १९८० मध्ये माझ्या हाती सत्ता होती. त्यावेळी निवडणूक झाली होती आणि ५० ते ५२ आमदार निवडणून आले. पुढच्या सहा महिन्यात ६ आमदारच शिल्लक राहिले. बाकी सगळे ५० ते ५२ आमदार सोडून गेल होते. त्यानंतर जी निवडणूक आली तेव्हा राष्ट्रवादीची संख्या ७२ झाली. राज्य सरकारमध्ये काम करता आलं. त्यामुळे फुटीची चिंता करु नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेशी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही फरक पडत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलं आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी द्या? मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा – जयंत पाटलांचा बॉम्ब?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनीच मोठा राजकीय सूर वातावरणात घुमला. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि सध्या प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी “मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा” अशी स्पष्ट आणि थेट मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. यामुळे पक्षात नेतृत्वाच्या पातळीवर मोठ्या बदलाची शक्यता व्यक्त होत आहे. जयंत पाटील म्हणाले, “ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे आणि आम्ही तुकारामांच्या बाजूने आहोत.” त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार हल्ला चढवला. “शिवभोजन थाळी बंद झाली, अनाथांसाठीचे पैसे वळवले जात आहेत, महापालिकांवर प्रशासक बसवले जात आहेत, निवडणुका टाळल्या जात आहेत,” अशी ताशेरेबाजी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. जयंत पाटील पुढे म्हणाले, ” जितेंद्र आव्हाड अजूनही शरद पवार साहेबांना घाबरतात!” तसेच, न्यायालयीन संस्थांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “न्यायाधीशांकडे पैसे सापडतात पण कोणतीही कारवाई होत नाही,” असे सांगत जयंत पाटलांनी यंत्रणांवरही निशाणा साधला. पक्षात कार्यकर्त्यांच्या नाराजीचेही त्यांनी गांभीर्याने उल्लेख केले. “कार्यक्रमात सर्वांना बोलवू शकलो नाही याची जबाबदारी माझी,” असंही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
जयंत पाटील यांचं शरद पवारांनी केलं कौतुक
जयंत पाटील यांनी सांगितलं आहे की नव्या पिढीला संधी द्या. आम्ही सगळ्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ. हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात नवीन पिढी, नवे चेहरे दिसले पाहिजेत. कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते आपल्या पक्षात आहेत. त्यांना संधी देऊ, प्रतीष्ठा देऊ आणि राज्य चालवणारं नेतृत्व आपण घडवलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. पुढचे तीन महिने तुमचं लक्ष त्यावर असलं पाहिजे. कर्तृत्ववान लोकांना संधी द्या. आपण येत्या तीन महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीच्या नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
कार्यकर्त्यांचे महत्त्व आणि नवीन नेतृत्वाला संधी
शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या त्यागाचे आणि कामाचे कौतुक केले. खासदार निलेश लंके यांचा उल्लेख करीत पवार म्हणाले, “ते रात्री १२ नंतरही लोकांना भेटतात.. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. असे कार्यकर्तेच राष्ट्रवादी काँग्रेसचा मौल्यवान ठेवा आहे, असे निष्ठावान कार्यकर्ते असतील तर सत्तेची चिंता करण्याची गरज नाही, ती नक्कीच मिळेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नव्या पिढीला संधी देण्याच्या सूचनेचे समर्थन केले. “जयंतरावांनी सांगितलेलं आहे की, नव्या पिढीला संधी द्या. आपण सगळे त्यांच्यामागे उभं राहूया. प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधू आणि सामूहिकपणाने निर्णय घेऊ,” असे पवार म्हणाले. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवीन चेहरे दिसले पाहिजेत आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी व प्रतिष्ठा दिली पाहिजे, असे त्यांचे मत होते, जेणेकरून राज्य चालवण्याची क्षमता असलेले नेतृत्व उभे राहील.
येणाऱ्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना निवडून द्या
“पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे पुढे आला आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम पक्षाने केलं. पक्षाला मिळालेली प्रतिष्ठा कार्यकर्त्यांच्या कामामुळेच आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांनी संधी देणार असून संधी दिली तर महिला कर्तृत्व दाखवतात. येणाऱ्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना निवडून द्या, 2-3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील,” असेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीकाही केली. ते म्हणाले, “राष्ट्रवादीने राष्ट्रहिताच्या बाबतीत कधीच राजकारण केलेले नाही. पहलगाम हल्ल्यानंतरही आम्ही हीच भूमिका स्वीकारली. सरकारच्याच भूमिकेचे समर्थन केले, पाठिंबा दिला.
निलेश लंके यांच्यावर स्तुतिसुमने
“तुम्ही कोणी कधी निलेश लंके यांच्या घरी गेलात का?” असा मिश्कील प्रश्न शरद पवार यांनी विचारताच सभागृहात हास्याचं वातावरण पसरलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पक्षातील फुटीची चिंता न करता निष्ठावान कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं. “लंके यांचं घर एका खोलीचं आहे. पण ते तिथे रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोकांची कामं करत असतात. अशा कार्यकर्त्यांमुळेच पक्ष उभा राहतो,” असे म्हणत त्यांनी निलेश लंके यांचं कौतुक केलं. शरद पवार पुढे म्हणाले, “तुमच्यासारखे कार्यकर्ते एकत्र राहिले, तर सत्ता आपोआप येईल. महाराष्ट्रात सत्तेचं चित्र बदलताना दिसत आहे.” त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना एकीचं आणि बांधिलकीचं महत्व अधोरेखित करत नवा आत्मविश्वास दिला.