श्रीगोंदा / नगर सह्याद्री
दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून, या सर्व निवडणुका पक्ष ताकदीने लढवणार असल्याची माहिती पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजी. शामभाऊ जरे यांनी दिली.
२०१९ मध्ये नवीन पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड पक्षाने श्रीगोंदा विधानसभा व नगरपरिषद निवडणुका लढवत आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले. नवीन पक्ष असूनही उमेदवारांनी अनेक मातब्बरांना पराभवाच्या उंबरठ्यावर आणत जनतेत छाप पाडली होती.
२०१९ पासून आतापर्यंत पक्षाने संघटनात्मकदृष्ट्या मोठी झेप घेतली असून, विचारांच्या बळावर पक्षाची ताकद अनेकपटीने वाढली आहे. जेष्ठ नागरिक, महिला, युवक, कामगार, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि शेतकरी या सर्व घटकांना पक्षाशी जोडण्यात पक्ष यशस्वी ठरला आहे.
दरम्यान, झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे पक्षाने आपली प्रभावी उपस्थिती दर्शवली होती. तसेच, विधानसभा निवडणुकीत अपक्ष माजी आमदार राहुल दादा जगताप यांना जाहीर पाठिंबा देऊन पक्षाने आघाडीच्या उमेदवाराला मागे टाकत आपली ताकद अधोरेखित केली.
आगामी निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड पक्षाने मांडवगण (२ गण), आढळगाव (२ गण), कष्टी (२ गण) या जिल्हा परिषद गटांत तसेच श्रीगोंदा नगरपरिषदेत उमेदवार उभे करण्याची तयारी पूर्ण केली आहे.
भानगाव पंचायत समिती गणातून इंजी. शामभाऊ जरे स्वतः प्रबळ दावेदार आहेत, तर कष्टी गणातून उपाध्यक्ष प्रफुल्ल (बापु) जगताप, आढळगाव गटातून शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज यांच्या सौभाग्यवती, श्रीगोंदा नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधून उपाध्यक्ष दिलीप लबडे आणि प्रभाग क्र. २ मधून सचिव सुयोग धस हे पक्षाचे संभाव्य उमेदवार असतील.
इतर ठिकाणीही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते इच्छुक असून, योग्य व पात्र उमेदवारांना संधी देण्यात येईल, असे इंजी. जरे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील अनुभव, संघटनात्मक बळ आणि जनतेचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यांच्या जोरावर संभाजी ब्रिगेड पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये निश्चितच उल्लेखनीय यश संपादन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.