संगमनेर | नगर सह्याद्री
एमआयएम पक्ष महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची मोठी घोषणा पक्षाचे नेते डॉ. परवेझ अशरफी यांनी केली आहे. पक्षाचे माजी खासदार व प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या एकला चलो रे च्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, संगमनेरमध्येही पक्ष पूर्ण ताकदीने उतरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ते संगमनेर दौर्यावर आले असता बोलत होते.
डॉ. अशरफी यांनी सांगितले की, माजी खासदार तसेच प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव समीर साहेब बिल्डर यांच्या आदेशाने ते संगमनेर व कोपरगावच्या दौर्यावर आहेत. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील एका कार्यक्रमात इम्तियाज जलील यांनी आता आघाडीचा विचार न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. याच धोरणानुसार, एमआयएम महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, गट-गण आणि महानगरपालिका अशा सर्व निवडणुका लढवणार आहे.सोमवारी संगमनेर शहरात एमआयएमची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या दौर्यात संगमनेरमधील इच्छुकांनी डॉ. अशरफी यांची भेट घेतली. यामध्ये नगरसेवक पदासाठी चार इच्छुक उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी एका इच्छुक उमेदवाराने भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच काही इच्छुक उमेदवार गुलदस्त्यात असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच इच्छुक उमेदवार यांच्या सोबत प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आणि महासचिव समीर साजिद बिल्डर समक्ष भेट घेणार असून पुढील रणनीती ठरवणार असल्याचे डॉ. परवेज अशरफी यांनी सांगितले.येत्या काळात संगमनेरच्या राजकीय पटलावर एमआयएम आपला झेंडा नक्कीच फडकवेल, असा विश्वास डॉ. अशरफी यांनी व्यक्त केला. तसेच, लवकरच खासदार इम्तियाज जलील आणि समीर साहेब बिल्डर हे स्वतः संगमनेरला भेट देणार असून, येथील जनतेशी थेट संवाद साधणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.


                                    
