spot_img
अहमदनगर"नगर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा"

“नगर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा”

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यात आजपर्यंत ३४३.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर मध्ये येणाऱ्या नद्यांच्या व धरणाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भिमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठवरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थलांतर करावे‌‌. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सरासरी पर्जन्याच्या 76.66% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले आहे. आज दुपारी 12.00 वाजता जिल्ह्यातील गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर धरणातून ४४ हजार ७६८ क्यूसेक, भिमा नदीत दौंड पूल येथून ७४ हजार ४५६ क्यूसेक, प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून २७ हजार ११४, निळवंडे धरणातून २१ हजार ८५५, ओझर बंधारा येथून १ हजार ३९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे ‌‌. कुकडी नदीत येडगाव धरणातून ७ हजार ५०० क्यूसेक, घोड नदीत घोड धरणात १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे‌.

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्हयात पर्जन्यमान सुरु असून दौंड पुल येथे भिमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. तरी अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. तरी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झालेली असून प्रवरा नदीच्या विसर्गामध्ये वाढ झालेली आहे. तसेच निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरु असून संततधार पाऊस वा अतिवृष्टी झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. पर्यायाने ओझर बंधा-यावरुन प्रवरा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. तरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

पुणे जिल्हयात सुरु असलेल्या पर्जन्यामुळे येडगाव धरणातून कुकडी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तरी अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील कुकडी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पुणे जिल्हयातील धरणाद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे घोड धरणाची पाणी पातळी वाढत असून घोड धरणातून घोड नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तरी अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क पक साधावा.असे आवाहन ही .पाटील यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....

तयारीला लागा! जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षणाचा फुगा फुटला, अनेक दिग्गजांना मोठा धक्का, कुठे काय निघाले आरक्षण पहा

अहिल्यानगर झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव / जिल्ह्यातील दिग्गजांना मोठा धक्का | राज्यातील...

एसईबीसी, ईडब्लूएस, ओपन आरक्षण नको का?; मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पहा

मराठा समाजाला सवाल | नेत्यांनाही धरले धारेवर नाशिक | नगर सह्याद्री राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी...

धक्कादायक! हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्ली, मुंबईत खळबळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था दिल्लीतील नामांकित शाळा बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी ताजी असतानाच आता...