मुंबई | नगर सह्याद्री
पारनेकरांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या पूर्वीच्या अहमदनगर सहकारी बँकेचे नामकरण महानगर आणि पुढे स्व. सॉ. गुलाबराव शेळके यांच्या निधनानंतर जीएस महानगर बँक असे नामकारण झाले. पाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या या बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या निमित्ताने बँकेवर सासुचे म्हणजेच सुमनताईंचे वर्चस्व राहते की स्नुषा असणार्या गीतांजलीताईंचे याचा फैसला मतदार दि. १ जून रोजी मतदानातून करणार आहेत. निर्णायक टप्प्यावर सध्या दोन्ही बाजूने प्रचार केला जात आहे. हायटेक यंत्रणा दोन्हीकडून राबविली जात असताना गुुलाल आमचाच असा दावा दोन्ही बाजूने केला जात आहे. भावनिक मुद्यांना हात घालत कोणी कोणावर कसा अन्याय केला आणि कोणी कोणाला कसे फसवले याचे पाढे वाचले आहेत.
निवडणुकीच्या निमित्ताने बँकेबाबत, बँकेच्या भविष्याबाबत न बोलता उणीदुणी काढली जात असून सभासदांच्या माध्यमातून सहकारातील असणारी ही बँक एका कुटुंबाची होऊ पाहत आहे. त्यामुळे सभासदांना देखील विचारपूर्वक मतदान करावे लागणार आहे.सॉ. गुलाबराव शेळके यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत काही सहकार्यांना सोबत घेत बँकेची स्थापना केली. आज या बँकेच्या अनेक शाखा असल्याचे आणि कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. गुलाबराव शेळके यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव अॅड. उदयराव शेळके यांनी बँकेची धुरा हाती घेतली आणि बँकेत पारदर्शी व तितकाच विश्वासपूर्वक प्रयत्न केले. बँकेची वाटचाल पाच हजार कोटींकडे होत असतानाच उदयराव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आणि त्यातून बँकेसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. बँकेचे काय असे वाटत असतानाच संचालक मंडळाने मोठ्या हिमतीने कंबर कसली. अधिकारी आणि कर्मचार्यांनी उदयरावांच्या निधनानंतर सभासद, ठेवीदार आणि कर्ज़दारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे अविश्वासाचे निर्माण झालेले मळभ दूर झाले. सुमनताई शेळके यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड केली गेल्यानंतर स्व. उदयरावांच्या सौभाग्यवती गीतांजलीताई आणि उदयरावांच्या भगीनी स्मीताताई या दोघींना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात आले.
दोघींचीही एकाचवेळी संचालक मंडळात एन्ट्री झाली आणि येथेच संघर्ष सुरू झाला. दोघींच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी अनेक बैठका दोन्ही बाजूने झाल्या. मात्र, तो काही केल्या संपला नाही. सभासदांची बँक असताना ही बँक आमचीच कशी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न सुरू झाला. विश्वस्ताच्या भावनेतून स्व. गुलाबराव आणि स्व. उदयराव या पितापुत्रांनी शेवटच्या क्षणापर्यंत काम केले.संचालक मंडळ निवडणुकीच्या निमित्ताने सुमनताई आणि गीतांजलीताई यांच्यात अपेक्षेप्रमाणे समेट झालाच नाही. नव्हे तसा प्रयत्नही झाला नाही आणि तो व्हावा असे कोणालाही वाटले नाही. बँक ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूने कंबर कसली गेली असून सत्ता ताब्यात देण्याचे आवाहन केले जात आहे. दि. १ जून रोजी मतदान होईल आणि त्यानंतर बँक कोणाच्या ताब्यात गेली हे स्पष्ट होणार आहे. तूर्तास प्रचार आणि गाठीभेठी वाढल्या आहेत.
साहेबांच्या विचारधारेला तिलांजली देणार्या गीतांजलीला धडा शिकवा
महानगर बँकेत गुलाबराव शेळके साहेब आणि उदयदादा यांची एकहाती सत्ता असताना या दोघांच्याही विरोधात जाहीरपणे भूमिका घेणारे आज एकत्र आले आहेत. ज्यांनी साहेबांना आणि उदयला त्रास दिला, त्यांना सोबत घेऊन साहेबांच्या विचारधारेला तिलांजली देणार्या गीतांजलीला धडा शिकवा असे आवाहन सुमनताई शेळके यांच्या समर्थकांकडून केले जात आहे. साहेबांना आणि उदयला ज्यांनी त्रास दिला त्यांच्या ताब्यात बँक द्यायची का? असा थेट सवालच मतदारांच्या गाठीभेठीत केला जात आहे.
पटेल हटाव, बँक बचावचा नारा!
गीतांजली शेळके यांच्या समर्थकांकडून सत्ता ताब्यात देण्याचे आवाहन करताना ‘पटेल हटाव, बँक बचाव’, अशी साद घातली जात आहे. पटेल हटाव म्हणजे स्मीताताई शेळके यांना हटवा असेच अप्रत्यक्षपणे आवाहन केले जात आहे. सुमनताईंच्या हातात बँक गेली तर बँकेची सुत्रे ही स्मीताताई आणि त्यांचे पती श्री. चिराग पटेल यांच्या हाती जातील असेही विरोधक सांगत आहे. गीतांजली शेळके याबाबत थेट बोलत नसल्या तरी त्यांच्यावर झालेला अन्याय आणि बँक का ताब्यात हवी हे मात्र त्या ठणकावून सांगत आहेत.
बँकेच्या न झालेल्या प्रगतीला दोघेही जबाबदार!
बँकेच्या पाच हजार कोटींच्या ठेवींच्या प्रगतीत कोण कसे अडसर ठरले आणि आडकाठी कोणी कशी आणली हा मुख्य मुद्दा दोन्ही पॅनलकडून मांडला जात आहे. उदयराव शेळके यांच्या निधनानंतर त्यांच्या मातोश्री सुमनताई चेअरमन झाल्या आणि भास्कर कवाद हे व्हाईस चेअरमन म्हणून पुन्हा कामकाज पाहू लागले. सुमनताईंच्या विरोधात भास्कर कवाद हे गीतांजलीताईंच्या पॅनलचे उमेदवार आहेत आणि दुसरीकडे सुमनताई उमेदवार आणि पॅनलच्या प्रमुख आहेत. बँकेच्या आर्थिक उन्नतीत, प्रगतीत आडकाठी आणली जात असल्याचा साक्षात्कार आता प्रचारातून केला जात असेल तर त्याचवेळी ते संचालक पदाचा राजीनामा देऊन बाहेर का पडले नाहीत? बँकेत हुकुमशाही पद्धतीने कामकाज झाल्याचे आता सांगितले जाते आणि ही हुकुमशाही मोडण्यासाठी सर्वांनी मदत करा असे सांगितले जात असेल तर याआधीच त्याविरोधात का आवाज उठवला नाही यासह अनेक प्रश्न सभासदांना पडले आहेत.