पुणे। नगर सहयाद्री
बारावी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरात बुधवारपासून (दि. २१) सुरूवात होत आहे. परीक्षेसाठी एकुण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच निर्धारित वेळेनंतर दहा मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे.
परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपारच्या सत्रात होणार्या परीक्षांसाठी विद्यार्थी २.३० पर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असणे आवश्यक आहे.
प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार असून या विषयासाठी १ लाख ९४ हजार ४३९ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. तसेच ठराविक विषयांसाठी कॅल्युलेटर वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र हे कॅल्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठल्या ही यंत्रात नसू नये. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
परीक्षेला बसणारे शाखानिहाय विद्यार्थी संख्या
– विज्ञान शाखा : ७,६०,०४६
– कला शाखा : ३,८१,९८२
– वाणिज्य : ३,२९,९०५
– वोकेशनल : ३७,२२६