मुंबई / नगर सह्याद्री –
मविआचे जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. २३० ते २४० जागांवर एकमत झालेय, पण काही जागांवर अद्याप पेच कायम आहे. मविआच्या नत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत उर्वरित जागांचा तिढा सुटेल असे सांगण्यात आलेय. आज मविआची जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये काही जागांवर चर्चा होणार आहे. जागा वाटप लवकर पूर्ण करण्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे बोलले जातेय. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मतभेद असल्याचे समोर आलेय. राज्यात या जागांवर एकमत होत नसल्यामुळे यादी दिल्लीमध्ये हाय कमांडकडे पाठण्यात आली आहे.
महाविकास आघाडीत तिढा असलेल्या जागांची यादी काँग्रेस नेत्यांनी हाय कमांडकडे पाठवली आहे. काँग्रेस हाय कमांडशी ठाकरेंच्या नेत्यांची चर्चा होणार आहे. प्रचारासाठी कमी वेळ असल्याने तिढा असलेल्या जागांचा विषय तातडीने संपवावा अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे.
विदर्भातील जागांचा तिढा, यादी काँग्रेसच्या हाय कमांडकडे
वीस ते पंचवीस जागांवर तिढा कायम असताना यामध्ये विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अधिक जागांवर तिढा असल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभेला अमरावती आणि रामटेक हे दोन लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने विधानसभेला विदर्भात चार ते पाच अधिक जागा काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला सोडाव्यात, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. त्यामुळे विदर्भातील अशा काही जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे दोन्ही आग्रही आहेत. आणि या जागांवर निर्णय घेणे राज्यातील काँग्रेस नेत्यांना काहीसे कठीण झाल्याने अशा जागांची यादी हायकमांडकडे काँग्रेसने पाठवली आहे.
कोकणात महा विकास आघाडीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ
रत्नागिरी – कोकणात जागा वाटपात महा विकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा मोठा भाऊ ठरणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात उद्धव ठाकरे सेना सर्वाधिक जागा लढणार असल्याचे समोर आलेय. आठ पैकी सात जागा उद्धव ठाकरे सेना लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील चार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागा उद्धव ठाकरे सेना लढवणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना भाजप आणि शिंदेसेनेला शह देणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातील 8 पैकी 7 जागांवर उद्धव ठाकरेंचे शिलेदार लढणार असल्याची माहिती समोर आली.