सुपा । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील मग्रारोहयो अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमधील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप व त्यावर सुरू झालेली चौकशीच्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांनी या प्रकरणावर थेट विरोधकांना लक्ष्य करत चौकशीने टक्केवारी सम्राटांना पोटसुळ उठला आहे का? असा रोखठोक सवाल उपस्थित केला आहे.
पारनेर तालुक्यात आमदार काशिनाथ दाते यांच्या पाठपुराव्यामुळे रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी सुरू आहे. या चौकशीत काही कामांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांची परवानगी न घेता आणि अपूर्ण प्रस्ताव असूनही मंजुरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका अधिकाऱ्याला अटक केली होती.
त्यानंतर आमदार दाते यांनी थेट रोहयो मंत्री यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शासन स्तरावर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तहसिलदार पारनेर यांनी सदर कामे करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कार्यान्वयीन यंत्रणा देण्याऐवजी जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद उपविभाग पारनेर यांना कार्यान्वयीन यंत्रणा देण्यात आली. सदर चौकशी मध्ये दुध का दुध पाणी का पाणी होईल.
गैरव्यवहार झाला नसल्यास कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्यांचे आर्थिक हितसंबंध या कामांशी आहेत तेच तालुक्यात आमदार साहेब विकासकामे थांबवत असल्याची टीका करत आहेत. राहिला प्रश्न विकासकामांचा तर विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीवर आमदार महोदय हे स्वत सदस्य असल्याने मोठ्या प्रमाणावर रोहयो कामे आपले मतदारसंघात होणार असल्याची माहिती विक्रम कळमकर यांनी दिली आहे.