सुपा । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसापासून ढगाळ व पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. या दरम्यान परिसरात विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा उडाला असून महावितरण विरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुमारे १० ते १२ गावांचे केंद्रबिंदू व मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात गेल्या दहा दिवसापासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. विज बिल भरण्यासाठी जशी तत्परता दाखवता तशी विजपुरवठा खंडीत झाल्यावर का दाखवत नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणचे अभियंता व कर्मचारी सपसेल अपयशी ठरत असून सद्या पावसाचे दिवस असल्याने डासांमुळे नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. चालु वर्षी पावसाळा हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला आहे. शेतीसाठी सोडा पण पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. थोडे फार पिण्यासाठी पाणी निघते मात्र त्यासाठी विद्युत पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सुपा ४३ केव्ही उपकेंद्रातून सुपा शहरा दिवसातून दहा ते बारा वेळा वीज पंधरा ते वीस मिनिटे गायब होते.
यामुळे व्यावसायिकांकडून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. कॉलेज रोड, औद्योगिक वसाहत, कोल्हे वस्ती, वाळवणे सह कडूस फिडरसाठी आपधूप, वाघुंडे, बाबुर्डी, रुईछत्रपती, भोयरे गांगर्डा, कडूस आदी ठिकाणी शेती पंप व सिंगल फेज (घरांसाठी) विद्युत पुरवठा केला जातो. या भागात गेल्या दहा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने पिण्याच्या पाण्यासह या गावांचा संपर्क तुटला आहे. विजेवर चालणारे विविध कंपण्यांचे मोबाईल टावर बंद झाल्याने सर्व व्यवहारच कोलमडले आहेत.
वारा सुटला तरी विद्युत पुरवठा बंद!
सद्या पावसाचे दिवस चालू आहेत, मात्र पावसाचे वातावरण झाले किंवा वारा सुटला तरी आपधूप, रुईछत्रपती, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस आदी गावांचा विद्युत पुरवठा बंद केला जातो. सुपा शहरात पाऊस चालू झाला तरी कडूस फिडरचा विद्युत पुरवठा बंद केला जातो. मग महावितरणचे कर्मचारी करतात काय? असा प्रश्न उपस्थित करून यात सुधारणा न झाल्यास नागरिकांच्या संघर्षाला महावितरणला सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही.
तिसऱ्या दिवशी बसवला रोहित्र
दैनंदिन जीवनात विजेचे महत्व खूप आहे. आपला विद्यूत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी ग्रामस्थ दर महिन्याला आलेले वीज बिल प्रामाणिक पणे भरतात, मात्र महावितरणकडून पाहिजे तेवढी सेवा मिळत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाळवणे रस्त्यालगत असलेल्या कोल्हे वस्ती येथील रोहित्र महावितरणकडून तिसऱ्या दिवशी बसवण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
कडूस फिडरसाठी एक तास विद्यूत पुरवठा
सुपा उपकेंद्रातून आपधूप, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस याठिकाणी शेती पंप व सिंगल फेज विद्यूत पुरवठा केला जातो. सुमारे दहा दिवसांपासून मान्सून पुर्व पावसाने थैमान घातले आहे. पाऊस मुबलक झाला मात्र पिण्याच्या पाण्यासाठी शेतीपंपाला दिवसात फक्त एक तास विद्यूत पुरवठा केला जात असल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातून एक ते दोन किलोमीटर पाइपलाइन आहेत, पंप चालू केला की घरी पाणी पडेपर्यंत लाईट गेलेली असते. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. महावितरणकडून आठ तास विद्यूत पुरवठा होणे आवश्यक असताना फक्त एक तासच विद्यूत पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.