अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सध्या सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे. दिवाळी म्हटले की नवे कपडे खरेदी करणे, घरात नव्या वस्तू घेणे, रोशनाई करणे, फराण बनवणे अशा अनेक गोष्टी आल्या. अनेकजण दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसतात. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळी खरेदीवरुन केलेल्या आवाहानामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ‘दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा’ असे वादग्रस्त विधान केले आहे.
सोलापूर येथे हिंदू आक्रोश मोर्च्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संग्राम जगताप म्हणाले होते की, मी सर्वांना विनंती करेन दिपावलीच्या निमित्ताने खरेदी करताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा मिळेल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे, अशा प्रकारची दिपावली सर्वांनी साजरी करावी, असे संग्राम जगताप म्हणाले होते. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना संग्राम जगताप यांचे विधान चुकीचे असून पक्षाला ते मान्य नसल्याचे म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, “त्यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय-धोरणे ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून कुठलाही खासदार-आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील, तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाहीत”
खरंतर अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत तिथं सगळं सुरळीत होतं. पण आता काही लोकांनी, आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलांचं छत्र आपल्यावर राहिलं नाहीये, त्यामुळे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे, असेही अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हाही त्यांना (संग्राम जगताप) सांगितलं होतं. ते म्हणाले होते की मी यामध्ये सुधारणा करेन, पण सुधारणा करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची जी भूमिका आणि विचार आहेत ते पक्षाला मान्य नाहीत”.
पक्षाने नोटीस पाठवली
सोलापूर येथे हिंदू संघटनांनी काढलेल्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी यंदाच्या दिवाळीत हिंदूकडूनच खरेदी करा असे वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असून पक्षाकडून त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
पक्षाची विचारधारा आणि ध्येय-धोरणे निश्चित झाल्यानंतर कोणत्याही खासदार, आमदार किंवा जबाबदार व्यक्तीने अशी वक्तव्ये करणे पक्षाला मान्य नाही. जेव्हा अरुण काका जगताप हयात होते, तेव्हा सर्व काही सुरळीत होते. आता संग्राम यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारीने वागावे आणि बोलावे. असंही अजित पवारांनी यावेळी म्हंटल.
पवार यांनी यापूर्वीही एका कार्यक्रमात जगताप यांना बोलण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यावेळी जगताप यांनी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यात बदल दिसत नसल्याचे पवार यांनी नमूद केले. त्यामुळे पक्षाच्या विचारांशी विसंगत असलेल्या या विधानाबाबत जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.