श्रीगोंदा | नगर सह्याद्री
कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेड व एनसीसीएफ मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असतो. नाफेड, एनसीसीएफचे अधिकारी सरकारी तिजोरीवर डल्ला मारत आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नाफेड व एनसीसीएफ या दोन संस्थांची कांदा खरेदी, साठवणूक व वितरणासाठी नेमणूक केली आहे. परंतु त्याची निवड प्रक्रिया पारदर्शक नाही. मागील व्यवहार अतिशय संशयास्पद, भ्रष्ट व अप्रामाणिक राहिला आहे, सरकारी निधीचा अपहार केला आहे. त्यांना पुन्हा कांदा खरेदीची जबाबदारी देणे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
कांदा खरेदीचा परवाना मिळण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात अशी चर्चा आहे. नाफेडचे विद्यमान अध्यक्ष यांनी, कांदा खरेदी करणाऱ्या काही संस्थांवर धाड टाकली होती. त्यात अनेक आक्षेपार्ह बाबी समोर आल्या होत्या. त्याचे पुढे काहीच झाले नाही. मात्र त्या नंतर जास्त गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहेत. काही फ्रेडरेशने कांदा खरेदी न करता फक्त कागदोपत्री साठा दाखवला. कांद्याचे दर वाढल्यानंतर काही फ्रेडरेशनने साठवलेला नाफेड व एनसीसीएफ चा उन्हाळ कांदा बाजारात विकला. नंतर कांदा देण्याच्या वेळेस स्वस्त लाल कांदा देऊन भरपाई केली.
महाराष्ट्रातून गोवा, कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश आदी राज्यांमध्ये अनुदानित दरात कांदा पुरविण्यात आला होता. यावेळी खोटी कागदपत्र तयार करून मोठ्या रकमेचा अपहार केला आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत कांदा चाळीत कांदा दिसून आला नाही. करदात्यांच्या पैसा व सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यात नाफेड, एनसीसी फ, फ्रेडरेशन व काही शेतकरी सहभागी आहेत असा आरोप अनिल घनवट यांनी केला आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी घनवट यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालयाला पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
यावर्षी होणाऱ्या कांदा खरेदीवर. स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना बारकाईने नजर ठेवणार आहे,. शेतकऱ्यांनी किरकोळ कमिशनसाठी भ्रष्ट फ्रेडरेशनकडून आपल्या बँक खात्यावर पैसे स्विकारू नयेत. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी, ग्राहक व सरकारी तिजोरीची लूट थांबवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जागरूक रहावे आणि स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.