सुपा / नगर सह्याद्री
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील पारनेर – विसापूर रस्त्यावर बाबुर्डी येथील बस क्रमांक १ लगत असलेल्या पुलावर मोठा खड्डा पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. बांधकाम विभागाने पुलावरील खड्डा बुजवून रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थ, प्रवाशी यांनी केली आहे.
मागील महिन्यात तालुक्यासह बाबुर्डी परिसरात मुसळधार पावसाने परीसर झोडपून काढला, बाबुर्डी बस क्रमांक १ लगत असलेल्या पुलाची उंची जमीनीच्या खाली असल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले यादरम्यान हा रस्ता सुमारे दहा ते बारा तास बंद होता. यावेळी शाळेत जाणारे विद्यार्थी यांना शाळा बुडवावी लागली तर प्रवाशांना रात्र भर रस्त्याच्या कडेला ताटकळत बसावे लागले, कंपनी कामगार, दुध उत्पादक शेतकरी व प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना लागला.
सुपा नवीन वसाहत फेज २ येथील वाहतूक तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतीमाल मुख्य बाजारपेठ असलेल्या पारनेर, सुपा, अहिल्यानगर, शिरूर, पुणे याठिकाणी नेण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो, पावसाळ्यात शालेय विद्यार्थी, दुध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीमधील कामगार, वृद्ध व्यक्ती यांना पावसाळ्यात नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. पुलाची उंची कमी असल्याने नुकत्याच झालेल्या पावसाने मोठा पूर आला होता या पुरात एका तरुणाने मोटारसायकल घातली असता मोटारसायकल सह तो वाहून गेला, दैव बलवत्तर म्हणून तो पुलाच्या कठड्याला अडकला मोटारसायकल दुसऱ्या दिवशी तरूणांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावरील पुलावर मधोमध मोठा खड्डा पडल्यामुळे मोटारसायकल चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने याठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पुलाची दुरूस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे.