spot_img
अहमदनगरAhmednagar Politics :आ. नीतेश राणेंवर किरण काळेंचा घणाघात, पनौती, टिल्लू म्हणत लिहिले...

Ahmednagar Politics :आ. नीतेश राणेंवर किरण काळेंचा घणाघात, पनौती, टिल्लू म्हणत लिहिले ‘हे’ पत्र

spot_img

नगर सह्याद्री / अहमदनगर
शहरातील सुमारे ४० हजार व्यापारी, दुकानदारांकडून व्यावसायिक परवाना शुल्क वसुलीचा महासभेने ठराव मंजूर केल्याच्या मुद्द्यावरून तापलेले राजकीय वातावरण काही केल्या शांत व्हायला तयार नाही. आता शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यापूर्वी व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर नगर शहराचा दौरा करणाऱ्या भाजप नेते आ. नीतेश राणे यांना खरमरीत पत्र ईमेल करत नगर शहराचा तातडीने दौरा करण्याचे जाहीर आमंत्रण दिले आहे.

व्यापाऱ्यांच्या प्रश्नावरून राणेंना पनौती, टिल्लू म्हणत खडे बोलही सुनवले आहेत. यामुळे शहर भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून भाजप यावर काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. पत्राची प्रत शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप यांना देखील ईमेल केली आहे.

काळे यांनी ट्विट केलेले पत्र पुढील प्रमाणे –
जय श्रीराम ! बरेच महिने झाले. आपण आमच्या नगर शहराकडे फिरकला नाहीत. देशात, राज्यात तुमच्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. अहमदनगर महानगरपालिकेत तुमच्याच महायुतीच्या राष्ट्रवादीच्या हातात सत्ता असून सत्तेचा रिमोट कंट्रोल देखील आहे. शहराला असणारे नगर दक्षिणेचे खासदार, पालकमंत्री देखील तुमच्याच भाजपचे आहेत. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर तुम्ही शहरात येऊन ढोंग करित टीका केली होती ते आणि तुम्ही तर आता विधानसभेत मांडीला मांडी लावून बसले आहात. हे नगरकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असतानाच नगर शहरातील तमाम हिंदू व्यापारी दुकानदारांवर मात्र तुम्ही सत्तेचा गैरवापर करत सुमारे १५ हजार रुपयां पर्यंतची परवाना शुल्क वसुली लादली आहे. तुमच्या अधिपत्याखाली चालणारी मनपा आता ती रद्द करता येत नाही असे सांगत आहे.

आमच्या नगरच्या बाजारपेठेत उभे राहत तुम्ही विखारी भाषणबाजी केली होती. कोणत्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकार दरबारी आवाज उठवू अशी ग्वाही दिली होती. शहरातल्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा शब्द तुम्ही दिला होता. संरक्षणाची जबाबदारी घेतल्याचे तुम्ही सांगितले होते. कोणी हिंदू व्यापाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर डोळे जागेवर ठेवणार नाही, असा शब्द तुम्ही दिला होता.

आता तुमचेच सत्ताधारी माझ्या नगर शहरातल्या अन्य धर्मीय व्यापाऱ्यांसह हजारो हिंदू व्यापाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहत आहेत. त्यांच्या घामाच्या, कष्टाच्या पैशांवर त्यांची वाकडी नजर पडली आहे. मात्र त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तुम्ही नगरमध्ये यायला तयार नाहीत. त्यांचे संरक्षण करायला तयार नाहीत. या उलट तुमचेच पदाधिकारी सत्ताधाऱ्यांकडून नजरचुकीने व्यापाऱ्यांकडून वसुली करण्याचा ठराव कसा संमत झाला हे सांगत पाठराखण करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला तुमचे काही पदाधिकारी याला विरोध असल्याची नौटंकी करत आहेत. यातून एकच स्पष्ट होते की, तुम्ही शहरातल्या तमाम हिंदू व्यापारी, दुकानदारांची बेगडी हिंदुत्व प्रेम दाखवत धादांत फसवणूक केली आहे. याबद्दल मी तुमचा तमाम हिंदूंच्या वतीने तीव्र निषेध करतो.

नगर मनपा आयुक्तांना तुम्ही जाहीररित्या ” भाxखाऊ ” म्हणत त्याला जास्त ” माज ” आला आहे का असाही जाहीर सवाल केला होता ? सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याला अशा प्रकारे शिवीगाळ करणे याचा काँग्रेसने तेव्हाही निषेध केला. आजही त्याचा मी पुन:श्च निषेध करतो. तुम्ही त्या वेळेला शो बाजी करत आयुक्तांना सरळ करण्याची भाषा केली होती. आज तेच आयुक्त तुमच्याच सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या हिंदू व्यापाऱ्यांना टार्गेट करत आहेत.

नगर शहरात काय ” मस्ती ” चालली आहे हे तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना जाऊन सांगणार असल्याचे म्हणाले होते. आत्ता आम्हाला समजलं की, तुम्ही जाऊन त्यांना हे सांगितलं की, नगर शहरातल्या व्यापाऱ्यांकडून परवाना शुल्क वसुली करा. हिंदू व्यापाऱ्यांना वेठीस धरा. माझ्या शहरातल्या हजारो व्यापारी, दुकानदारांना, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांना, त्यांच्या कुटुंबांना तुम्ही नाहक परवाना शुल्क वसुलीचा निर्णय लादून सत्तेच्या माध्यमातून संकटात ढकलले आहे. व्यापारी, दुकानदारांवर तुम्ही अन्याय केला आहे.
मी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांच्या विचारावर चालणारा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मी स्वतः हिंदू आहे. प्रभू श्रीराम माझे आदर्श आहेत. सर्वधर्म समभाव या विचारांवर माझा विश्वास असून माणुसकीचा धर्म मी महत्त्वाचा समजतो. तुम्ही मात्र प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन नगर शहरातील वातावरण दूषित केले. बाजारपेठेत ताण तणाव निर्माण केला. गुण्या गोविंदाने व्यापार करत पोट भरणाऱ्यांमध्ये भांडणे लावली.

तुम्ही येऊन गेल्यापासून नगर शहरातील व्यापाराला जी उतरती कळा लागली आहे तेव्हापासून माझ्या हिंदू व्यापारी बांधवांवर आर्थिक संकट कोसळले आहे. तुम्ही माझ्या शहरासाठी ” पनौती ” ठरले असून तुमचा ” पायगुण ” कसा आहे हे आता नगरकरांना समजले आहे. त्यातच तुम्ही आता सत्तेचा गैरवापर करून परवाना शुल्क वसुली सुरू करून अन्याय करत आहात. याचा मी निषेध करतो.

शो बाजी करून परत मुंबईला जायला मी आलेलो नाही असे तुम्ही म्हणाले होते. मात्र तुम्ही तेव्हापासू नगरकडे जे पाठ फिरवून गेले आहात ते पुन्हा फिरकलेच नाहीत. मी तुम्हाला हिंदू व्यापारी बांधव आणि काँग्रेसच्या वतीने जाहीर निमंत्रण देतो की, आपण दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तात्काळ नगरचा दौरा करा. सत्ता तुमची आहे. हे परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करून माझ्या व्यापारी बांधवांना दाखवून द्या. २०२४ ला प्रचाराला येऊन हिंदूंची ताकद मी दाखवणार असे तुम्ही म्हणाला होतात. तेव्हा तुम्हाला नगरमध्ये येऊ द्यायचे की नाही ते नगरकर ठरवतील. कारण तेव्हा येऊन तुम्ही पुन्हा गरळ ओकणार, भांडणे लावणार. तेव्हा येण्या ऐवजी यायचंच असेल तर आत्ता माझ्या व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी या. आग लावण्यासाठी नको.

आणि राहिला प्रश्न हिंदुत्वाचा. तर तुमचे आणि तुमच्या पक्षाचे, तुमच्या पक्षा समवेत महायुतीत असणाऱ्या शहराच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे तथाकथित हिंदू प्रेम किती बेगडी आहे हे आता व्यापारी, दुकानदारांसह शहरातील माझ्या हिंदू तरुणांना, माता-भगिनींना समजले आहे. शहरात खरे हिंदुत्ववादी जर कोण होते तर ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणारे जननायक स्व. अनिलभैय्या राठोड. त्यांनी हिंदुत्व जपले. मात्र अन्य धर्मियांवर कधी अन्याय केला नाही. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडले नाही.

आज मी आणि काँग्रेस कार्यकर्ते त्याच अनिलभैय्या यांच्या विचारांवर शहरात काम करत आहोत. त्यामुळे बाहेरून येऊन माझ्या शहरातील वातावरण विनाकारण खराब करत इथला व्यापार, उद्योग उध्वस्त करण्याचा आपण प्रयत्न कराल तर याद राखा. शेवटी तुमचे विचार किती ” टिल्लू ” आहेत हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले आहे. तूर्तास एवढेच.

पत्राच्या शेवटी राम राम ! जय संविधान ! जय महाराष्ट्र !

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...