निघोज । नगर सहयाद्री:-
निघोज (ता. पारनेर) येथे गुढी पाडव्या निम्मित बैठक आयॊजीत करण्यात आली होती. नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी व वर्षाचे भविष्य काय असणार आहे. याची माहिती घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान, बैठकीत पाणी प्रश्नावर युवा पुढारी गरम झाले. एकमेकांना धरतात की काय असा प्रसंग निर्माण झाला. मात्र काही ज्येष्ठ मंडळींनी यामध्ये हस्तक्षेप केल्याने प्रकरण शांत झाले. बैठकीच्या प्रारंभी पोपट महाराज देशपांडे यांनी नववर्षाचे पंचाग वाचन करताना पाउस पाणी तसेच हवामान याचा आढावा घेतला. त्यांनतर काही ज्येष्ठ तसेच युवा पुढाऱ्यांनी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यात्रा उत्सव वर्गणी, बैलगाडा शर्यत, उरुसाच्या दिवशीचा तमाशा तसेच अखंड हरिनाम सप्ताहवर सविस्तर चर्चा केली. पाणी प्रश्नांवर चर्चा सुरू असताना ग्रामपंचायत अखत्यारीत पुष्पावती नदीवरील कपिलेश्वर बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी वापरु नये असा विषय चर्चेत आला. मात्र एका युवा शेतकऱ्याने यावर हरकत घेऊन हा बंधारा शेतीच्या पाण्यासाठी बांधला असल्याची आठवण करून दिली. तेथेच तू तू मैं मैं सुरु झाली. वाद वाढत गेला. बैठकीत असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी हस्तक्षेप केला म्हणून प्रकरण शांत झाले.
पारनेर कारखाण्याच्या माध्यमातून कपिलेश्वर बंधाऱ्याचे काम झाले. शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर झाला पाहिजे हा उद्देश होता. मात्र गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या बंधाऱ्याचा वापर कशाप्रकारे झाला पाहिजे हा अधिकार ग्रामपंचायतकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कुकडी डावा कालवा अधिकाऱ्यांनी जे पिण्यासाठी सातत्याने पाणी सोडले आहे. त्याची पाणीपट्टी ग्रामपंचायतने भरली आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता बंधाऱ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी झाला पाहिजे हे स्पष्ट निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोवीस तास या ठिकाणी सुरू आहे. सध्या बंधाऱ्यात पाणी साठा कमी आहे. तसेच आगामी काळात यात्रा उत्सव आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याचा फक्त नळपाणी पुरवठा योजनेसाठी वापर करण्यात यावा. अशी सुचना लोकआग्रहास्तव असताना सुद्धा संबंधित युवा शेतकऱ्याला मुद्दा व्यवस्थीत मांडता न आल्याने बैठकीत वादंग निर्माण झाले अशी चर्चा यावेळी झाली.
पन्नास टक्के पाणी आठ दिवसात वाया
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रा दि.२१ एप्रिल पासून सुरू होत आहे. सहा ते सात लाख भावीक यात्रेसाठी हजेरी लावतात. नुकतेच कपिलेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडले होते. मात्र बंधाऱ्यातील फाळके नादुरुस्त असल्याने पन्नास टक्के पाणी आठ दिवसात वाया गेले. सध्या या बंधाऱ्यात फक्त तीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ग्रामपंचायतने लक्ष घालून बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती केली म्हणून हा तीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यात्रा जत्रा, उरुस हे लक्षात घेता यातील पाणी शेतकऱ्यांनी वापरु नये असे आवाहन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी केले आहे.