मुंबई । नगर सहयाद्री:-
गेली आठ दिवसांपासून प्रतीक्षा असलेला राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि ठिकाण अखेर जाहीर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या पाच डिसेंबर रोजी मुंबईत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणता आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आणि लाल दिव्याची गाडी कोणाला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. राज्यातील जनतेने महायुतीला मोठे बहुमत दिले आहे, त्यानंतरही मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडला होता. मुख्यमंत्र्यांचे नाव अजूनही निश्चित झाले नाही. मात्र, येत्या पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर रंगणार आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा (BJP) होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. सरकार स्थापनेला वेळ लागत असल्यामुळे विरोधात टीकेचे सूर उमटू लागल्यामुळे अखेर शपथविधी सोहळ्याचे ठिकाण आणि तारीख महायुतीकडून जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. नव्या मुख्यमंत्र्यासोबत कोण कोण शपथ घेणार, हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.
मागील महायुती सरकारमध्ये जिल्ह्याला एकच मंत्रिपद मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्याने महायुतीला भरभरून मतदान केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ पैकी १० जागा महायुतीला मिळाल्या. त्यामध्ये भाजपला ४, अजित पवार गटाला ४ आणि शिंदे सेनेला २ अशा एकूण दहा जागांचा समावेश आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी जिल्ह्यातील कोणाला मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
जिल्ह्यात भाजपच्या दोन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून आठव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. ते ज्येष्ठ नेते असून जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे ते किंग मेकर ठरले आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी निश्चित आहे.
आमदार शिवाजी कर्डिले
भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघातून विजय मिळवला आहे.जिल्ह्यात रणनिती आखण्यात कर्डिले यांचा मोठा वाटा असतो. तसेच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या कायम संपर्कात असतात. त्यामुळे त्यांचीही मंत्रिपदी वर्णी लागू शकते.
आमदार मोनिका राजळे
शेवगाव मतदारसंघातून हॅटट्रिक करणाऱ्या आमदार मोनिका राजळे या जिल्ह्यात एकमेव महिला आमदार आहेत. त्यांचाही भाजपकडून मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो.
आमदार आशुतोष काळे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये कोपरगावचे आमदार आशुतोष काळे मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. त्यांचे हे मताधिक्य राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते.
आमदार संग्राम जगताप
अहमदनगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते. प्रचारातही ‘लाल दिवा, भावी मंत्री हाच मुद्दा त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे मांडला होता. भावी मंत्री म्हणून त्यांचे फलकही शहरात झळकले आहेत.