Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण केले. त्यांचे पाच दिवस उपोषण चालले, उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. मात्र, यादरम्यान मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी झाली. हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे कोर्टाने म्हटले होते. सरकारने मराठा समाजाबाबत काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज हा आक्रमक होताना दिसत आहे. यावर मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना खडेबोल सुनावले आहे. आरक्षणात सगळ्या मराठ्यांना घालणारच मी मराठ्यांचा नोकर आहे आणि समाजासाठी काम करतो आहे असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.
जरांगे यांनी म्हटले की, कोणी कितीही काहीही केले तरीही मी माझ्या गरिबांना आरक्षण देणार आणि हे माझ्या गरिब मराठ्यांना पटलेले आहे आणि ओबीसींमध्ये मराठ्यांना मीच घालणार…ओबीसींसाठी उपसमिती तयार केली चांगले आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी मी सक्षम आहे. कोणी कितीही उपसमित्या बनवल्या तरीही आम्हाला आरक्षण मिळणारच. याचवेळी त्यांनी छगन भुजबळांवरही टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांसह छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘कुणी कितीही उपसमित्या बनवल्या तरीही आरक्षण मिळवणारच. मी माझ्या समजाला आरक्षण मिळवून देणारच. आम्ही काहीच टेन्शन घेत नाही. ओबीसीमध्ये मराठ्यांना मीच घालणार आणि आरक्षण मीच देणार आहे. कुणी कितीही काही बोलले तरी आरक्षण मिळवूनच देणार. कितीही काय झाले तरी त्याचा आम्हाला फरक पडत नाही.’
भुजबळांबद्दल बोलताना जरांगे यांनी म्हटले की, भुजबळ हे पक्ष संपवणारा आणि कार्यकर्त्यांन संपवणारा माणूस आहे. जे आता जीआरबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत, ते अगोदर कुठे झोपले होते, बैठकांना बोलावल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत. मराठा समाजात संभ्रम निर्माण होत नाही आणि होणारही नाही. मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी लढतो, झगडतोय तितके कोणीही करणार नाही.
जरांगे पुढे म्हणाले की, ‘ओबीसी समाजासाठी उपसमिती गठित केली तर आणखी एक काम करा. दलित मुस्लिमांसाठी उपसमिती करा, एक उपसमिती शेतकऱ्यासाठी, आदिवसांसाठी एक आणि मायक्रो ओबीसीसाठी एक उपसमिती स्थापन करा. माझा विषय आरक्षण आहे. मी त्याच्यावर तुटून पडलो आहे.
आमच्यात कुणीही संभ्रम निर्माण केला तरीही मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि माझा समाजही विश्वास ठेवणार नाही. उठले की टीव्हीवर जाऊन बोलायचे. बाकी हे कशाला येत नाहीत ना बैठकांना येतात, ना बोलवल्यावर चर्चा करायला येत नाहीत. कुरापती काढून संभ्रम निर्माण केला जातो आहे पण मराठा समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. जे बोंबलत आहेत त्यांना बोंबलू द्या. मराठवाड्यातल्या सगळा मराठा मी आरक्षणात घालणार. काही दिवसांत मराठ्यांना हे दिसणार आहे. मराठ्यांनी संभ्रम निर्माण करुन घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आहे.
संजय राऊतांच्या आरोपांवर मनोज जरांगे म्हणाले, “शिंदे साहेब बिचारा माणूस तस कधीच करु शकत नाही. राऊत साहेबांना माहित असेल, राजकीय कारणे असतील. राऊत साहेब चांगेल नाहीत अस मी म्हणत नाही. परंतु असे खरे असते तर मी म्हणले असते. आम्हाला आरक्षण नाही पाहिजे. फक्त फडणवीसांना घेरायच आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्हाला काय म्हणाले मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, उभे राहू देणार नाही. मराठे कसे येतात पाहू?. एकदिवसाची परवानगी. मग, त्या रागात तसे करायचे असते, तर फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाऊन धुतले असते” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही शिंदेंच आंदोलक हस्तक आहात, असा त्यांचा आरोप आहे. “मी फक्त मराठ्यांचा नोकर आहे. मराठयाचे पोरगे आहे. मी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस यांना मोजत नाही” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.