पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली?
गणेश जगदाळे। पारनेर
पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. पारनेर तालुक्यातील व जुन्नरच्या हद्दीलगत आळकुटी, शिरापूर, म्हस्केवाडी, कळस, गारखिंडी, लोणी मावळा, दरोडी या गावांमध्ये बिबट्यांचा सुळसुळाट आहे. मंगळवार दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी कळस येथील रानमळा रस्त्यावर उसाच्या शेताजवळ गणेश तुळशीराम गाडगे (वय ४०) या निष्पाप तरुणाचा बिबट्याने हल्ला करून जीव घेतला. ही हृदयद्रावक घटना वनविभागाच्या निष्काळजीपणाचा कळस आहे!
या भागात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, ही घटना घडण्यापूर्वी आठ दिवस आधीच शेतकरी अंकुश काने आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गाडगे यांनी वनविभागाला बिबट्यांचा वावर वाढल्याची माहिती देत पिंजरा लावण्याची मागणी केली होती. पण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या या बेजबाबदार वृत्तीमुळेच गणेश गाडगेचा जीव गेला, असा संतप्त सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.
कळस परिसरात बिबट्यांचे दर्शन आणि जनावरांवरील हल्ले ही नित्याची बाब झाली आहे. ग्रामस्थांनी वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करूनही वनविभागाचे अधिकारी डोळेझाक करतात. ही हलगर्जीपणाची परिसीमा आहे! ग्रामस्थ विचारत आहेत, आमच्या जीवाची किंमत वनविभागाला काय आहे? बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले का उचलली जात नाहीत? पिंजरा लावण्याची जबाबदारी अधिकारी नेमकी का झटकतात?
वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे आणखी किती निष्पापांचे बळी जाणार? आता तरी प्रशासन जागे होणार की पुन्हा उडवाउडवीची उत्तरे देणार? आसा ग्रामस्थांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे. वनविभागाने तातडीने पावले उचलून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा यापुढे होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला वनविभागच जबाबदार असेल अशी मागणी करण्यात येत आहे.
कळस येथील घटनेने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागात नियमित गस्त, पिंजरे, आणि जागरूकता मोहिमांची गरज आहे. ग्रामस्थांना सुरक्षिततेची हमी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे हा विश्वास डळमळीत झाला आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन तातडीने पावले उचलावीत.
बिबट्यांचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना निर्भय जीवन जगण्याची संधी द्यावी. अन्यथा, जनतेचा उद्रेक आणि आंदोलने अटळ ठरतील. वनविभागाने आत्मपरीक्षण करावे आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलावीत. गणेश गाडगेचा बळी हा केवळ आकस्मिक नाही, तर वनविभागाच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. आता प्रश्न आहे पुढचा बळी कोण?
ठोस उपाययोजनांची गरज
पारनेर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऊसाचे क्षेत्र नसतानाही बिबटे सक्रिय असून,बिबट्याच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरीही वन विभागाकडून ठोस उपायोजना होताना दिसत नाहीत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव आणि कायदेशीर बंधने यामुळे नागरिक स्वसंरक्षणापासून वंचित आहेत.
घाटात सोडले जातात बिबटे
पारनेरच्या पठार भागावर तसेच राहुरी व नगर श्रीगोंदा परिसरात वन विभागाकडून पकडण्यात येत असलेले बिबटे हे माळशेज घाट किंवा अणे घाटातच सोडून दिले जातात. त्यामुळे ते बिबटे सहाजिकच पुन्हा पठार भागाकडे येतात वनविभागाच्या या उदासीनतेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे.