जालना / नगर सह्याद्री : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या. जे मराठे लढले, त्यांच्यासाठी हा मागासवर्गीय अहवाल आला. ते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहेत. ज्यांना त्यामधून आरक्षण द्यायचे आहे त्यांनी ते घ्यावे, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणे व त्यांच्यासाठी सगे-सोयरे कायदा अंमलबजावणी करावीच लागेल, त्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी करावी लागेल. नाही तर आम्ही कोणालाच सोडणार नाहीत. 20 तारखेपर्यंत काही करून अध्यादेशाची अंमलबजावणी करा. हैदराबाद गॅझेट घ्या. सग्या सोयऱ्यासाठी समितीला एक वर्ष वाढवून द्यावे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. जर दिलेले शब्द पाळले नाही तर २० तारखेनंतर आंदोलनाची दिशा बदलेल, 20 तारखेपर्यंतच्या उपोषणानंतर सरकारने सरकारचे बघावे, मराठा मराठ्यांचे बघतील असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मुंबईला गेल्यामुळे फसवणूक नाही तर अंमलबजावणीत फसवणूक
सगळा मराठा कुणबीच आहे. मुंबईला गेल्यामुळे फसवणूक झालेली नाही. अंमलबजावणीत फसवणूक झालीय असं तुम्ही म्हणू शकता. कुणीही गोड बोलून मराठ्यांना माघारी पाठवलेलं नाही. समाजाच आणि माझ अतूट नात झाल आहे. मराठ्यांना फसवलं, तर नव्याने लढाई उभारेन, असं त्यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, नारायण राणे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी असं बोलणे हे शोभत नाही. अशा मोठ्या नेत्याला आम्ही काही बोलणं हे देखील उचित नाही. आम्ही आजवर त्यांच्यावर कधी बोललेलो नाहीत. परंतु यानंतर जर त्यांनी आमच्यावर टीका केली तर आम्ही त्यांनाही सोडणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.