सुनिल चोभे | नगर सह्याद्री
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग आता बाजारपेठेतून गल्लीबोळात पोहोचला आहे. महापालिका आयुक्त डॉ. यशवंत डांगे यांनी बुधवारी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करताच शहरातील राजकीय पारा चांगलाच चढला आहे. आपल्या सोयीचा भाग कोणत्या प्रभागात आला आहे, हे पाहून महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी महापालिका निवडणुकीसाठी मैदानं ठरवून ठाकले आहे.
त्यातच नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत मोठे बदल झाल्याने प्ररभागातील गणिते बदलली आहेत. प्रभाग सोयीचा असला तरी प्रभागातील आरक्षणाकडे सर्वांच्या लक्ष लागले आहे. 17 प्रभाग आणि 68 नगरसेवकांसह महापालिकेच्या रणसंग्रामाचीचौकट निश्चित झाली आहे. मात्र, या प्रारूप प्रभाग रचनेमुळे अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड, फेररचना झाली आहे. यामुळे काहींच्या आशा पल्लवित झाल्या तर काहींच्या राजकीय गणिताचा बट्ट्याबोळ झाला आहे.
नव्या प्रारूप रचनेत प्रत्येक प्रभागात 18 हजार 500 ते 22 हजार 500 पर्यंत मतदार असणार आहेत. प्रभाग फोडणीमुळे अनेक अनुभवी नगरसेवकांचे गड उद्ध्वस्त, तर नव्या चेहऱ्यांसाठी संधीचे दार खुले झाले आहे. काही प्रभागात राजकीय नेत्यांची गडबाजार आणि मतदारांच्या समीकरणाची पुन्हा मांडणी होणार आहे. हरकत दाखल करण्यासाठी अवधी असल्याने पुढील काही आठवड्यात या सुनावणीच्या निमित्ताने प्रभागनिहाय राजकीय तापमान आणखी चढणार आहे.
गणेशोत्सवाला महापालिका निवडणुकीचा रंग
गणपती बाप्पाच्या आगमनासह शहरात सणाची धामधूम आहे, पण यावषची गणेशोत्सवाची सजावट आणि मांडवात राजकीय रंग ठळक दिसत आहे. संभाव्य उमेदवार आपली शक्ती आणि संघटनशक्ती उघडपणे दाखवत आहेत. मंडळांवर बॅनरबाजी, भव्य मांडव, आणि सणाच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत. परिसरासह गल्लीत मी कसा सरस हे फ्लेक्सबाजीच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे. एकंदरीतच महापालिका निवडणुकीसाठी नगर शहरातील राजकीय वातावरण पावसाळ्यात गरम झाल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीत याची झलक पहावयास मिळणार आहे. प्रभाग तोडफोडीमुळे अनेक मातब्बरांना घक्का बसला असून नव्या चेहऱ्यांचा उदय होणार असल्याने प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.