अहमदनगर | नगर सह्याद्री
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असल्याने सर्व 29 महानगरपालिका, 257 नगरपालिकांमध्ये प्रभागांची रचना करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करावी, असा आदेश नगरविकास विभागाने सर्व पालिकांना मंगळवारी दिला. मुंबईत 227 प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे.
मुंबईवगळता अन्य महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात येणार आहे. या आदेशानुसार अहिल्यानगर महापालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात होण्याची शक्यता आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील प्रभागांची संख्या वाढविली होती.
राज्यात सत्ताबदल झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या युती सरकारने 8 सप्टेंबर 2022 रोजी आधीच्या रचनेनुसार प्रभागांची संख्या कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. नगरविकास विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार महानगरपालिकांमध्ये 8 सप्टेंबर 2022च्या निर्णयानुसार प्रभागांची संख्या गृहीत धरण्याची सूचना करण्यात आली आहे. नगरपालिकांमध्ये मात्र उद्धव ठाकरे सरकारने 25 जानेवारी 2022च्या निर्णयानुसार प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे.
एका प्रभागात किती मतदार
प्रभाग रचना करताना महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या भागिले महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार एका प्रभागात समाविष्ट करावयाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाणार आहे. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त या मर्यादेत ठेवता येईल. प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात केली जाणार आहे. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत प्रभाग रचनेचा शेवट महानगरपालिका क्षेत्राच्या दक्षिण दिशेला केला जाणार आहे. प्रभागांना क्रमांकही त्याच पध्दतीने दिले जाणार आहेत.
नगरसेवक संख्या किती याकडे लक्ष..
अहिल्यानगर महापालिकेत प्रभाग रचना करण्याचे अधिकार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना आहेत. डांगे यांनी तयार केलेली प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सादर करावी लागणार आहे. त्यानंतर या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही प्रारूप प्रभागांची यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. अहिल्यानगर शहरात वाढीव मतदारांची संख्या गृहीत धरल्यास प्रभागाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत 17 प्रभाग होते अन 68 नगरसेवकांची संख्या होती.
अडीच महिन्यांचा कालावधी अपेक्षित
आयुक्तांनी प्रभाग रचना तयार केल्यावर राज्य निवडणूक आयु्क्तांकडे मान्यतेसाठी पाठवावे लागेल. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावर प्रभागांचे प्रारूप जाहीर केले जाईल. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी करून प्रभागांची अंतिम रचना निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावर प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली जाईल. ही आठ टप्प्यातील प्रक्रिया पार पडण्यासाठी किमान अडीच महिने लागू शकतात. म्हणजेच ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभागांची अंतिम रचना जाहीर होईल. त्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाईल. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जाते.