पुणे / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये संभाव्य एकत्रीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अनेकदा एकाच मंचावर दिसल्याने या चर्चा अधिकच गडद होत होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शरद पवार यांचे खुलेपणाने कौतुक केल्याने महायुतीत पवारांना घेण्याचा संकेत मिळतोय का? अशी चर्चा देखील रंगली. मात्र, या चर्चांवर आज खुद्द शरद पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली असून, आपल्या नेहमीच्या थेट शैलीत त्यांनी अवघ्या तीन शब्दांतच हा विषय संपवला “मला माहिती नाही…”, असं म्हणत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला पूर्ण विराम दिला आहे.
यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार” या केवळ हवेतल्या चर्चा आहेत. “शरद पवार शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार मानणारे नेते आहेत. अशा धर्मांध आणि जातीय शक्तींशी ते कधीही जाऊ शकत नाहीत,” असंही राऊतांनी ठामपणे नमूद केलं.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे “मला माहिती नाही…” हे उत्तर अनेक अर्थांनी घेतलं जात आहे. राजकीय शांतता राखण्यासाठी दिलेले उत्तर की रणनीतीचा भाग? मात्र, एका गोष्टीची खात्री आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे राजकारण सध्या अनिश्चिततेच्या वळणावर आहे आणि शरद पवारांचा पुढील निर्णयच या चर्चांना अंतिम दिशा देईल.
एकत्र येण्याबाबत रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
ठाकरे बंधूनंतर अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास पुन्हा राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे. आमदार रोहित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यादरम्यान रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवार म्हणाले,दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, जसा प्रश्न तुम्हाला पडला आहे. तसा अनेकांना पडला आहे. मात्र आजपर्यंत फक्त ही चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवर सर्व आमदारांना घेऊन शरद पवार, सुप्रिया सुळे,जयंत पाटील आम्हाला कुठेही काही सांगितले नाही, जर आम्हाला काही कळालं तर आम्ही म्हणजे समोरून नक्की येऊन सांगू. सगळ्यात जास्त मी सरकारवर टीका केली आहे’.
‘शरद पवारसाहेब म्हणत असतील, यातील मला काही माहीत नाही, तर मी म्हणेन, मला यातील काही समजत नाही. सुप्रिया सुळे यावर जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. पवार साहेब यांच्या मनात काय आहे, हे कळत नाही. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बरीच काही चर्चा झाली. पुढच्या पिढीची जबाबदारी सुप्रिया ताई यांना दिली आहे. त्यामुळे सुप्रियाताई काय भूमिका घेत हे बघावे लागेल. राजकीय विषयावर ते बोलले असतील, तर वेगळेच काही होत असतं. पक्षाची जबाबदारी सुप्रिया ताई यांच्यावर आहे’.
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी भाष्य केलं. ‘मराठी अस्मिता टिकावी, यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पक्ष स्थापन केला. त्याला आपण शिवसेना म्हणतो. आता दोन शिवसेना आहेत. त्यातील एका शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. दुसऱ्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत. डीएनए एक आहे म्हटले जाते. मग प्रताप सरनाईक महापालिका निवडणुका येत आहेत म्हणून वेगळी भूमिका घेत आहेत. अमहाराष्ट्रीय मते मिळावी म्हणून प्रताप सरनाईक यांना पुढे केले जाते का असं म्हणायचं का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.