कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‘रयत’ ठरणार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आता शेतीसह विविध क्षेत्रात होणार असल्याने गावागावातील रयत शिक्षण संस्थेच्या पाचवीपासून ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय आहे हे समजण्याची गरज आहे. त्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमधून पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या 1 जुलैपासून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिक्षण देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा माजी महसूल आयुक्त सनदी अधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी ‘नगर सह्याद्री’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केली.
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी ‘नगर सह्याद्री’च्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांचे सह्याद्री परिवाराच्या वतीने मुख्य संपादक शिवाजी शिर्के आणि निवासी संपादक सुनील चोभे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशासनात उच्च पदावर काम केल्यानंतर चंद्रकांत दळवी यांचा ग्रामविकासाशी निगडीत काम करण्याचा मनोदय होता. त्यानुसार त्यांनी कामही सुरू केले होते. सत्व फाऊंडेशनची स्थापना त्याच साठी केली. या फौंडेशनच्या माध्यमातून ग्रामविकासातील मोठे काम चालू आहे.
राज्यातील पंधरा गावांमध्ये हे काम सध्या सुरू असताना अचानक रयत शिक्षण संस्थेत चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. खरेतर या संस्थेचा मी माजी विद्याथ आहे. माजी विद्यार्थ्याला चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळण्यात संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांची भूमिका महत्वाची ठरल्याचे श्री. दळवी यांनी आवर्जुन सांगितले.रयत शिक्षण संस्थेचा जन्मच मुळी लोकसहभागातून कर्मवीर अण्णांनी घातला. त्यांनी गावागावात शिक्षक दिले, देऊळ- वाड्यातून सुरू झालेल्या शाळा आता मोठ्या कँपसमध्ये उभ्या आहेत. राज्यात साडेसातशे शाखा रयतच्या आहेत आणि आमच्या आधीच्या विश्वस्तांनी खूप मोठे काम उभे केले आहे. त्या- त्या गावातील लोकांचे मोठे योगदान संस्थेच्या वाढीत महत्वाची ठरली आहे.
स्थानिक पातळीवरील अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करताना ज्यांच्या जीवावर शाखा उभी आहे, त्या सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जात आहे. लोकांच्यामधून शाखांना अधिकाधिक पाठबळ मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. विस्तारापेक्षा जे काही काम झाले आहे ते टिकवणे आणि शाखांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे, त्यातील सातत्य टिकविण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे. खासगी शिक्षण संस्थांचे मोठे आव्हान समोर असताना आम्ही काही बदल स्वीकारत आहोत. त्याचे चांगले परिणाम नक्कीच पुढच्या काही काळात तुम्हाला पहायला मिळतील.
रयतच्या वर्गखोल्यांमधील ब्लॅकबोर्ड किंवा ग्रीनबोर्ड, खडूफळा आता काढून त्याजागी आता आम्ही इंटरॅक्टीव्ह पॅनल बसविण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून चालू आहे. पुढच्या सहा महिन्यात सर्व शाळांमध्ये हे पॅनल बसविले जातील आणि आमचे सर्व विद्याथ हे टेक्नोसेव्ही झालेले तुम्हाला दिसतील. विद्यार्थ्यांना त्यांचा कंटेन्ट आता वेबसर्कलच्या माध्यमातून मिळेल. साडेसात हजार वर्गखोल्यांपैकी चार हजार वर्गखोल्यांमध्ये हे पॅनल बसविले गेले आहेत. शिक्षकांना यासाठीचे प्रशिक्षण आम्ही दिले आहे. शिक्षकांच्या जोडीने विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयाचे मोठे स्वागत होत असल्याचेही श्री. दळवी यांनी सांगितले.