नगर सहयाद्री । विशेष संपादकीय
नाव अरुण बलभीमराव जगताप; परंतु परिचित अरुणकाका या ‘फेव्हरेट’ नावाने. नगर शहराच्या राजकीय क्षितिजावर अखंड 35 ते 40 वर्षे चमकणारे एक व्यक्तिमत्त्व. किंबहुना नगर शहराचे राजकारणच त्यांच्या भोवती फिरणारे. ते आपल्याभोवतीच कसे फिरत राहील याची त्यांनी नेहमीच काळजी घेतली.
अरुणकाका मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री या गावचे. नगर-सोलापूर महामार्गावरील हे छोटेसे गाव. या गावच्या सुपुत्राने आपल्या कार्याने नगर शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच आपले नाव कायम तळपत ठेवले. नगरच्या नगरपालिकेची आणि त्यानंतर महानगरपालिकेची सत्ता आपल्या माणसांच्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले व त्यात ते यशस्वीही होत गेले.
माळीवाडा, बुरूडगाव रोड आदी भागात सुरुवातीच्या काळात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे केले आणि नंतर केडगावसह नगरच्या अन्य भागांतही ते उभे केले. प्रारंभीच्या काळात तरुण पोरांचा गराडा त्यांच्याभोवती कायमच पडलेला असे. शंकरराव घुले यांच्यानंतर ते नगरचे नगराध्यक्ष झाले. पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी नगराध्यक्ष म्हणून भूषविला. या काळात नगर शहरावरील त्यांची राजकारणाची पकड अत्यंत घट्ट होती. राजकीय डावपेच आखण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे होते. आपला माणूस कोणत्या ठिकाणी बसवायचा हे त्यांनी एकदा ठरविले म्हणजे पूर्णत्वास नेऊनच ते थांबायचे. नगर शहरातील विसाव्या शतकातील नव्वदचे दशक हे अरुणकाकांचे म्हटले तरी चालेल.
ते नगरचे नगराध्यक्ष झाले. त्या अगोदर ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरच्या राजकीय क्षितिजावर शिवसेनेच्या माध्यमातून अनिलभैय्या राठोड यांचा उदय झाला आणि अरुणकाकांच्या राजकारणाला शह बसू लागला. अरुणकाकाकांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली परंतु त्यात त्यांना अबयश आले. नगर शहरातून आमदार म्हणून निवडून येण्याची त्यांची इच्छा तशीच राहून गेली; परंतु 2014च्या विधानसभा निवडणुकीत आपले सुपुत्र संग्राम जगताप यांना त्यांनी निवडून आणले. तेही शिवसेनेचे मातब्बर उमेदवार तथा कार्यरत आमदार अनिल राठोड यांचा पराभव करून. 2019च्या निवडणुकीतही त्यांनी आमदार संग्राम जगताप यांना निवडून आणले. समोर अनिलभैय्या राठोडच होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते दोनदा विधानपरिषदेवर निवडून गेले व आमदारकीचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. 2019 च्या निवडणुकीतही आमदार संग्राम जगताप यांना त्यांनी निवडून आणले. अपक्ष, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला.
अरुणकाकांची राजकराणाची सुरुवात युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली. युवक काँग्रेसचे ते अध्यक्षही झाले. त्यातूनच त्यांंनी नगर शहराच्या राजकारणात आपले बस्तान बसवायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर नगर शहराचे राजकारण आपल्याभोवती कसे फिरत राहील याचे डावपेच ते नेहमीच खेळत असत. जिभेवर साखर असल्याने विरोधकांना आपलेसे करण्यात ते कायम यशस्वी ठरले. यामुळेच आपले द्वितीय सुपुत्र संग्राम जगताप यांना तीन वेळेस नगर विधानसभा मतदारसंघात आमदार करण्यात ते यशस्वी झाले. नगर शहराच्या राजकारणात एकेक पाऊल पुढे टाकत त्यांनी सुरुवातीला नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर स्व. शंकरराव घुले यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते शहराचे नगराध्यक्षही झाले.
काकांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनाही आपल्या बाजूला वळविले आणि ते नगरध्यक्ष झाले. या काळात त्यांनी विविध विकासकामांना चालना दिली. हरित नगरसाठी वृृक्षारोपणाचा प्रकल्पही राबविला. नंतर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा निवडणूक लढविली पण त्यात ते अपयशी ठरले. महापालिका स्थापनेनंतर 2003 साली नगर महापालिकेची पहिली निवडूक जाहीर झाली. त्यांनी विनीत पाऊलबुधे यांच्या विरोधात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविली; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. नंतर 2008 साली महापालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडून आले. विधान परिषद सदस्य म्हणून ते दोनदा निवडून आले. त्यांनी आपले ज्येष्ठ सुपुत्र सचिन जगताप यांना जिल्हा परिषदेवर निवडून आणले.
राजकारणाव्यतिरिक्त अरुणकाकांचे अन्य सामाजिक कार्यांशीही संबंध होता. गुणे आयुर्वेदिक शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात ही संस्था नावारूपाला आली. संस्थेतील अनेक विभागांच्या नव्या इमारती बांधण्यात आल्या. या शिवाय स्वच्छ व देखणे पटांगण, फाटक यामुळे गुणे आयुर्वेद महाविद्यालय उजळून निघाले. काकांना तसे विविध खेळांमध्येही चांगली रुची होती. विशेषत: कुस्ती आणि क्रिकेट हे त्यांचे आवडीचे क्रीडा विषय. नगरकरांनी ते अनुभवले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत होते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जिल्हा मध्यवत सहकारी बेँकेवरही त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले.
अरुणकाकांचे घराणे तसे धार्मिक तेही वारकरी संप्रदायातील. त्यामुळे नेहमीच त्यांच्याकडून विविध धार्मिक कार्यक्रम केले जायचे. त्यांचे वडील बलभीमराव जगताप हे तर पक्के वारकरी. जगताप कुटुंबाची पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीवर नि:सीम भक्ती. जगताप कुटुंब नगर ते पंढरपूर वारीला असते. आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांनीही हा वारसा पुढे चालविला आहे. वारी काळात त्यांच्याकडून वारकाऱ्यांच्या भोजनासह अन्य सेवा कायम होत असतात. जीवनातील प्रत्येक आनंदाच्या क्षणी जगताप कुटुंबाने पंढरपूरला जाऊन दर्शन घेणे हे ठरलेलेच! अरुणकाका म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. प्रेमळ स्वभाव, माणसे जोडण्याची हातोटी व संकटकाळी मदत करण्याची वृत्ती यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व कायमच नगरकरांवर गारूड करून राहिले. त्यांचे अकाली जाणे हे अनेकांना हुरहुर लावणारेच ठरले. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वास ‘नगर सह्याद्री’ परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.