संगमनेर | नगर सह्याद्री
तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका. मतभेद विसरून एकत्र या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकदीने लढा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले कारखान्याचे कार्य सहकारमहर्षींच्या शिस्त, पारदर्शकता आणि विचारांवर आधारित आहे. निवडणुकीपूर्वी अफवा पसरल्या, पण सभासदांनी एकमताने निर्णय घेतला आणि तो फुगा फुटला.त्यांनी संगमनेरच्या राजकीय संस्कृतीचं कौतुक करताना बंधूभाव, शिस्त आणि एकतेचा आदर्श मांडला.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक हंगाम नवीन आव्हाने घेऊन येतो आणि काही प्रश्न हे केंद्र सरकारशी निगडित असतात. आपण एकजुटीने त्यांना सामोरे जावे लागेल. संगमनेरची खास राजकीय ओळख अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितले.