वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते
पारनेर । नगर सहयाद्री:-
निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष बॅंकेची संकल्पना आरोग्यासाठी लाभदायक असून वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ, दत्तात्रय रसाळ यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले आहे. निघोज येथील स्मशानभूमी परिसरातील ऑक्सिजन पार्कची पाहाणी तसेच शिववाडी येथील वृक्षबॅंकेचे उद्घाटन आमदार दाते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ भास्करराव शिरोळे, युवा नेते सचिन पाटील वराळ, मळगंगा ट्रस्टचे वसंत कवाद, अमृताशेठ रसाळ तसेच चंद्रकांत लंके, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, अनिल शेटे, संतोष रसाळ, रोहिदास लामखडे, अनिल लंके, प्रा. ज्ञानेश्वर कवाद, राजू लाळगे आदींसह वृक्षप्रेमी उपस्थित होते.
वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ यांनी माहिती देताना सांगितले की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व सह्याद्री फौंडेशनचे अध्यक्ष प्रसिद्ध कलाकार सयाजी शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेत मी व माझ्या सहकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात हजारो वृक्षांची लागवड करीत संगोपन केले. आज तेथील वृक्षबॅंक राज्यात नावलौकिकास पात्र ठरली आहे. अशाप्रकारे आपण गावाकडे काम करावे यासाठी निघोज येथील स्मशानभूमी परिसरात ऑक्सिजन पार्क तसेच शिववाडी रसाळवाडी परिसरात शेकडो वृक्षांची लागवड करीत संगोपन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यासाठी गावकऱ्यांचे मोठे पाठबळ मिळत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय रसाळ यांनी केले. तर आभार मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त संतोषर साळ यांनी मानले.
स्मशानभूमीतील ऑक्सिजन पार्क पाहून समाधान: आ. दाते
रसाळ बंधू यांनी स्मशानभूमी परिसरात उभा केलेला निसर्गनिर्मित ऑक्सिजन पार्क पाहून खूप समाधान व आनंद मिळाला आहे. शिवववाडी येथील वृक्षबॅंक व सोशल मिडिया हे सर्व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी धर्तीवर आयोजित केलेली शिववाडी ग्रामस्थांची संकल्पना भारावून टाकणारी आहे. तसेच शिववाडी, रसाळवाडी निघोज परिसरातील ग्रामस्थांनी परिसर निसर्गरम्य केला असून यामध्ये रसाळ बंधू यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्याला झाडे लावा झाडे जगवा हा संदेश चाळीस वर्षांपूर्वी दिला.आजही राळेगणसिद्धी व परिसरात गेल्यानंतर सावलीच्या सानिध्यात बसून कडक उन्हाळा जाणवत नाही. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजन टंचाईला सामोरे जावे लागले यापुढे असे संकट येऊ नये यासाठी वृक्षारोपण आणी वृक्षंगोपन सर्वाधिक महत्वाचे असून यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज, असल्याचे आवाहन आमदार दाते यांनी केले आहे.