मुंबई / नगर सह्याद्री :
नैऋृत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (१५ मे) दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली असून, त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराच्या काही भागासह, संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असल्याने पावसाच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी तर जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सावधानगिरीचा इशारा म्हणून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. विविध ठिकाणांवर उद्या वादळी पावसाची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उद्या विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याचे (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने म्हटले आहे.
पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शुक्रवारी ( १६ मे) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपुरी येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. तसेच अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली येथे देखील ३८ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात आले आहे.
30 मे पर्यंत धो-धो पाऊस : पंजाबराव डख यांनी व्यक्त केला हवामान अंदाज
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामान अंदाज व्यक्त करताना म्हटले की, शेतकऱ्यांनी शेतीची कामे जितका वेळ मिळेल तितक्या वेळेत लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्न करावा. कारण संपूर्ण राज्यामध्ये 15 मे ते 30 मे पर्यंत पावसाळ्यासारखा धो-धो पाऊस पडणार आहे. हा पाऊस पूर्व आणि पश्चिम विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्र, कोकणपट्टी तसेच खानदेश, मराठवाडा म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पडणार असल्याचे त्यांनी म्हटले व इतकेच नाही तर उन्हाळ्यात आजपर्यंत कधीही इतका पाऊस पडला नाही इतक्या प्रमाणात यावेळेस पाऊस पडणार असल्याचे देखील त्यांनी अंदाज वर्तवताना म्हटले.विशेष म्हणजे त्यांनी सांगितले की पाऊस इतका होईल की ओढे नाले आणि नद्यांना देखील पाणी येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 15 ते 30 मे दरम्यान पडणारा पाऊस हा बीड जिल्ह्यात जास्त होणार असून त्यासोबतच धाराशिव, लातूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर म्हणजे जवळपास संपूर्ण राज्यात हा पाऊस पडणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.