श्रीगोंदा । नगर सहयाद्री
साखर उद्योगात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपती बाबुराव बोत्रे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुन्हा एकदा सिध्द केला आहे. ओंकार ग्रुपतर्फे पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही मदत ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, संचालिका रेखा बोत्रे पाटील आणि संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्त केली.
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार संभाजीराव निलंगेकर आणि यामिनी पाटील यांचाही प्रमुख सहभाग होता. याप्रसंगी बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले, शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. मात्र अतिवृष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने मदतीचा हात पुढे केला असून या उपक्रमात ओंकार ग्रुपचा सहभाग राहावा ही आमची भावना आहे.
पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा प्रगतीचा दीपोत्सव उजळावा, या उद्देशाने आम्ही कर्तव्य पार पाडले. ओंकार ग्रुपने शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवत दिलेली ही मदत ओंकार ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.