संगमनेर । नगर सहयाद्री:-
संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांच्यातील वाद पेटला आहे. धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य विधान केल्याने संगमनेर तालुक्यात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून संतप्त कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी गाड्यांना आग लावली आहे. या प्रकरणानंतर सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान,वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मात्र जाळपोळ करणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली. गाड्या जाळणाऱ्यांचे व्हिडीओ-फोटो आमच्याकडे आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे विखेंनी सांगितले.
पुढे बोलतांना सुजय विखे म्हणाले, “मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ सुरु केली, गाड्या फोडल्या, आमच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरही कारवाई करा. तसेच आमच्याबद्दल चुकीच वक्तव्य केलं, तर आम्ही देखील गप्प बसणार नाही.” असा इशाराही त्यांनी दिला.
नेमका वाद काय?
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी भाजप नेते सुजय विखे पाटीलयांची सभा झाली. या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. त्यामुळे थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली असून एका गाडीची जाळपोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, संतप्त महिलांनी धांदरफळ येथील सभास्थळी ठिय्या देत घोषणाबाजी केली.