पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
दहा-बारा दिवसांच्या पावसाच्या प्रतिक्षनेतर अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सायंकाळनंतर अहिल्यानगर शहर, उपनगर व दक्षिण जिल्ह्यातील अहिल्यानगर, शेवगाव, पाथ्रडी, श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
सुमारे अर्धा ते एक तास हा पाऊस सुरू राहिला. शहर व उपनगरातील अनेक भागांत झाडांची फांद्या तुटल्या, तसेच काही ठिकाणी विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्यामुळे हातगाड्यांवर विक्री करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांचे साहित्य भिजून नुकसान झाले. काही भागांत रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली.
दरम्यान, दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव, पाथड व श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागांत वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही ठिकाणी शेतीच्या पीकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्यांमध्ये देखील काही भागांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा पावसाने उपस्थिती लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही भागांत खरिपाच्या पेरण्यांच्या तयारीला वेग आला असला, तरी अचानक येणाऱ्या वादळी पावसामुळे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.
बुधवारी सायंकाळच्यासुमारास सोनई, शनिशिंगणापूर, धनगरवाडी, मोरया चिंचोरे, पानसवाडी येथे तुफान वाऱ्यासह पाऊस पडला. या वादळामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. शेतकऱ्यांची कांदा चाळीतील कांदा भिजला. विद्युत खांब, मोठी मोठी झाडे कोसळली. विजेच्या तारा तुटून पडल्या. काही ठिकाणी डीपी चे पोल पडले. झाडे पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ जेसीबीच्या साह्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली. काही ठिकाणी चार चाकी वाहनावर झाडे पडल्याने मोठे नुकसान झालेले आहे. कांगोणी गावात सरपंच सोमनाथ कराळे यांच्या घरावर लिंबाचे झाड व नव्या वांबोरी रोडवरील शिक्षक भागवत वीरकर यांच्या चार चाकी नव्या वाहनावर झाड कोसळले.
अहिल्यानगर शहरासह ग्रामीण भागातील बत्तीगूल
गेल्या दहा बारा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसापेक्षा वादळी वाऱ्याचा जोर अधिक होता. ग्रामीण भागात बुधवारी दिवसभर वीज गायब होती. तर बुधवारी रात्री अन गुरुवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळित झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. गेल्या दोन दिवसापूव हवामान खात्याने पुढील चार-पाच दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच वादळी वाऱ्यापासून आणि नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुधवारी सकाळपासून ग्रामीण भागात वीज गायब होती. बुधवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ग्रामीण भागात विद्युत पोल पडले. परिणामी वीज गुल झाली. गुरुवारी दुपारपर्यंतही वीज पुरवठा सुरळित झालेला नव्हता. शहरासह ग्रामीण भागात विस्कळित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागला.
अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट
अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात दि. 10 ते 12 जून 2025 या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून दि.13 व 14 जून 2025 रोजी वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844 अथवा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
बोल्हेगावला वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर
बुधवारी रात्री आठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बोल्हेगाव परिसरामध्ये अक्षरश: मोठमोठी झाडे रस्त्यावर कोलमडून पडली. त्यामुळे विजेचे खांब, तारा रस्त्यावर तुटुन पडल्या. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली व शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने महापालिका आपत्कालीन विभागाशी संपर्क साधत अधिकारी कर्मचारी यांना घटनास्थळी पाठविले. माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात रस्त्यावर मोठमोठी झाडे पडली होती. ती तातडीने काढण्याचे काम केले गेले. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. गावातील युवकांनी भर पावसात आपत्कालीन परिस्थिती मधील कर्मचाऱ्यांना मदत केली. तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या तत्परतेमुळे बोल्हेगावातील आपत्कालीन परिस्थितीतील कामे तातडीने माग लागत नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले असे श्री. वाकळे यांनी सांगितले.