spot_img
अहमदनगर‘आपला हक्काचा माणूस’ हीच माझी ओळख; नगर शहर विकसीत होतंय आणि बदलतंय...

‘आपला हक्काचा माणूस’ हीच माझी ओळख; नगर शहर विकसीत होतंय आणि बदलतंय याचे मोठे समाधान

spot_img

‘आपला हक्काचा माणूस’ हीच माझी ओळख, हे समाधान फक्त माझ्या वाट्याला ः आ. जगताप
माझे काम हाच माझा आरसा आणि तीच माझी आश्वासनपूर्ती | नगर शहर विकसीत होतंय आणि बदलतंय याचे मोठे समाधान
विशेष मुलाखत / शिवाजी शिर्के
राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही सरकारच्या माध्यमातून नगर शहराला भरीव निधी आणला. नगरकरांना बदल पहायला मिळत आहे. उपनगरे फक्त वाढलीच नाही तर विकसीत झाली. नालेगाव, बुरुडगाव, कल्याण रोडसह सावेडी उपनगर विकासीत झाले. पुण्याच्या धर्तीवर नगरचा विकास चालू आहे. नगरमध्ये सुरक्षीत वातावरण आहे. गगणाला भिडणार्‍या इमारती उभ्या राहत असताना येथे सुरक्षीत वातावरण निर्माण झाले हेच मुख्य कारण आहे. गल्लीबोळातील काँक्रीटचे रस्ते सात- आठ वर्षापूर्वीपर्यंत पहायला मिळत नव्हते. ते आता पहायला मिळत आहेत. त्यामुळे नगरकरांच्या संपर्क आणि कामाच्या बाबत आम्हीच उभे राहतो हे आमची जमेची बाजू आहे. आपला माणूस कोण, आपले प्रश्न विधानसभेत मांडणारा कोण, प्रश्नांची सोडवणूक करणारा कोण हे सारे पाहून नगरकरांनी संग्राम जगताप या नावाची निवड केली आहे. तो मोठा विश्वास निर्माण करण्याचे काम मी आणि माझ्या सहकार्‍यांनी केले आहे. नगरकर आपल्या हक्काची माणसे जाणतात. आपल्या हक्काच्या माणसाच्या पाठीमागे उभे राहतात हे आजपर्यंत तरी मी नगरच्या भूमीत अनुभवले असल्याचे प्रतिपादन नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केले. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला वाढदिवसाचे औचित्य साधून ते ‘नगर सह्याद्री’शी बोलत होते. आ. जगताप यांनी विविध मुद्यांवर थेटपणे भाष्य केले आणि सडेतोड भूमिका मांडली.

अद्ययावत सुविधांनी युक्त दोन स्पोर्टस् कॉप्लेक्सची नगरच्या वैभवात भर!
नगर शहराच्या वैभवात भर घालणारी दोन स्पोर्टस कॉम्पलेक्स नगर शहरात उभी राहत आहेत. वाडिया पार्ड क्रिडा संकुल असले तरी ते राज्य सरकारचे आहे. आता महापालिकेच्या मालकीचे दोन संकुल उभे राहत आहेत. सारसनगर परिसरातील चिपाडेमळा येथे अरुणोदय स्पोर्टस कॉम्पलेक्स उभे राहत आहे. बारा- तेरा प्रकारच्या विविध क्रिडा प्रकारातील खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुमारे दहा कोटी रुपये खर्चाचे हे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. स्वीमींग पुल आणि आऊट डोअर गेम्सची सुविधा असणारे दुसरे स्पोर्टस कॉम्पलेक्स गंगा उद्यानच्या पाठीमागे उभे करत आहोत. त्याची निविदा प्रक्रिया झाली आहे. या दोन्ही संकुलांसाठी महापालिकेने फक्त जागा दिली आहे. यासाठी मोठा प्रयत्न करून राज्य सरकारचा निधी उपलब्ध झाला असून त्यांच्याच निधीतून ही दोन्ही संकुले उभी राहत आहेत. सिद्धीबागेत मनपाच्या मालकीचा स्वीमींग पूल होता. त्याची दुरवस्था झाली असल्याने आता गंगा उद्यान येथे दुसरा स्वीमींग पुल होत आहे.

केडगाव देवीसह गणपती मंदिराकडे येणारे रस्ते चकाचक झाले याचे समाधान!
दीडशे कोटी रुपयांचा निधीतून मोठी कामे मार्गी लावली. यातून केडगाव देवीकडे येणारे सर्व रस्ते आणि पूल घेतला. आनंदधामकडे येणारे सर्व रस्ते केले. कोणत्याही चौकातून आले तरी रस्ते पूर्ण झालेत. गणपती मंदिर हे शहरवासीयांचे ग्रामदैवत. पुणे हायवेकडून गणपती मंदिराकडे जाणारे तीन रस्ते आहेत. यातील सक्कर चौक- काटवन खंडोबा चौक ते अमरधाम हा रस्ता नॅशनल हायवेकडे आहे. तो आपल्याला करता येत नाही. मात्र, गणपती मंदिराकडे जाणारा स्वस्तीक चौक- टिळक रोड- गणपती मंदिर, आंबेडकर पुतळा ते गणपती मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माळीवाडा वेस असे तीनही रस्ते अत्यंत दर्जेदार करण्यात आले असून त्यामुळे गणपती मंदिराकडे येणार्‍या नगरकरांसह भाविकांना आणि वाहन चालकांना सुखद अनुभव मिळत आहे. ग्रामदैवताकडे जाणारे रस्ते पूर्ण केले याचे समाधान आहे. याशिवाय सिव्हील ते अप्पू हत्ती चौक, अप्पू हत्ती चौक ते न्यू आर्टस कॉलेजमार्गे दिल्लीगेट आणि दिल्ली गेट ते नेप्ती नाका हा मुख्य रस्ता देखील पूर्ण झाला आहे. अप्पू हत्ती चौकापासून ते कापडबाजारातील भिंगारवाला चौक आणि भिंगारवाला चौक- कोतवाली पोलिस स्टेशन- आशा टॉकीज- पंचपीर चावडीमार्गे गणपती मंदिर हा रस्ता पूर्ण केल्याचे समाधान आहे.

दोन म्युझिकल फाऊंटन शहराच्या वैभवात भर घालणारे
अडीच वर्षे महाविकास आघाडी आणि पुढे महायुतीच्या माध्यमातून मोठी कामे मार्गी लावली. जिल्ह्यात आजपर्यंत एकही म्युझिकल फाऊंटन नव्हते. आज नगर शहरात दोन फाऊंटन (कारंजे) उभी राहत आहेत. त्यातील एक बुरुडगाव भागातील साईनगर येथे सुरू झाले आहे. दुसरे सावेडीतील गंगा उद्यान येथे उभे राहत आहे. या दोन्हींसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून निधी आणला आहे. यासाठी महापालिकेचा निधी वापरला गेलेला नाही. या म्युझिकल फाऊंटनमुळे नगरकरांना सहकुटुंब विरंगुळ्याचे आणि मनोरंजनाची सोय होणार आहे.

ताबेमारीबद्दल बोलणार्‍यांच्याच
विरोधातच ताबेमारीच्या पोलिसांत तक्रारी!
ताबेमारीचा विषय हा त्यांच्याकडून केला जाणारा प्रपोगंडा आहे. ज्यांच्या खासगी अडचणी आहेत, विरोधी राजकारणी आहेत त्यांच्याकडून राजकारण्यांना हाताशी धरले जाते! न्यायव्यवस्था आहे. कायदा आहे. पोलिसात गेले पाहिजे. मात्र, असे असताना सनदशिर आणि कायदेशिर मार्गाचा अवलंब कोणी करत नाही. ताबेमारीबद्दल ओरडणार्‍यांच्या विरोधातच पोलिसात याच कारणास्तव तक्रारी झाल्या आहेत. यातील काहींनी देवस्थानच्या जागा बळकावल्यात. कोणी खासगी प्रापर्ट्या बळकावल्यात! याचेही त्यांच्यावर आरोप आहेत. यात मी कोणाचे नाव घेऊन त्यांना मोठे करणार नाही. ते त्या उंचीचे नाहीत. त्यांच्या बिनबुडाच्या आरोपांना मी उत्तर देण्याइतकी त्यांची कोणतीच उंची नाही. खुज्या विचाराने ही सारी मंडळी ग्रासली आहेत. त्यांच्या प्रभागातच नव्हे तर त्यांना ग्रामपंचायतीला उभे केले तरी ते निवडून येणार नाहीत! ज्यांच्यामागे जनाधार नाही, ज्यांनी कायमच सुपार्‍या घेण्याचे उद्योग केले, त्यांची नावे नगरकरांना माहिती आहेत. त्यांची पात्रता नगरकरांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे.

टोळ्यांच्या कथित टोळधाडीला आणि
त्यांच्या म्होरक्यांचा कावा नगरकरांनी ओळखलाय!
मताधिक्य कमी केल्याचा दावा करणारे, निर्णायक भूमिकेत आल्याचे बोलणारे, सत्ताधारी आमदाराचे जनमत घटले असे बोलणार्‍यांना कोणता नैतिक अधिकार आहे. यावेळी कोणतीच लाट नसताना नगरमधून मोठे मताधिक्य मिळाले आहे. ही निवडणूक विधानसभेची नव्हती. मागच्या लोकसभा निवडणुकीत मी पराभूत झालो होतो. त्यावेळी माझ्या विरोधात ज्यांनी प्रचार केला, त्यांच्या इतकी विश्वासर्हता आज एकाचीही नाही. नगरकरांच्या हितापेक्षा स्वार्थापोटी एकत्र आलेली ही टोळी आहे आणि या टोळीला वेेगवेगळी स्वप्ने पडू लागली आहेत. स्वार्थाच्या पोळ्या भाजण्यातच हे पटाईत आहेत. सुपारी घेतल्यागत यांची सकाळ होते आणि सुपारीतून मिळालेल्या बिदागीने यांची ‘सोय’ होते. नगरकरांच्या हिताआड येणार्‍या या टोळ्यांच्या कथित टोळधाडीला आणि त्यांच्या म्होरक्यांना नगरकर नक्कीच ओळखून आहेत. कोणताही विकासात्मक अजेंडा नसलेल्या टोळीकडून अनेकांना वेठीस धरण्याचे काम झाले आहे.

नगरकरांसाठी २७ कोटींचे सरकारी हॉस्पिटल!
नगरकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जवळपास २७ कोटी रुपये खर्चाची रुग्णालयाची देखणी सुखसुविधायुक्त इमारत उभी राहत आहे. या इमारतीचा चौथा- पाचवा मजला उभा राहिला आहे. बुरुडगाव येथे जिजामाता हॉस्पिटल नावाने हे हॉस्पिटल नगरकरांच्या सेवेत येणार आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, तपासण्या आणि शस्त्रक्रिया येथे होणार असून त्यासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज लागणार नाही असा आशावाद आ. जगताप यांनी व्यक्त केला.

‘त्यांच्या’ इतकी विश्वासार्हता यांच्यात दाखवा!
नगरमधील या आधीच्या विधानसभा निवडणुकीत मला प्रतिस्पर्धी असणार्‍या उमेदवाराइतकी विश्वासर्हता यांची नक्कीच नसल्याचा टोला आ. जगताप यांनी विरोधकांना अनिल राठोड यांचा नामोल्लेख टाळत लगावला. स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणारी ही मंडळी दखलपात्र नक्कीच नाहीत. त्यांचा केविलवाणा प्रयत्न नगरकरांच्या चेष्टेचा विषय झाला आहे. कायम दुकानदारी करणार्‍या या टोळीने विश्वार्हता गमावली असल्याचा टोलाही आ. जगताप यांनी लगावला.
‘संग्राम जगताप हाच आपला माणूस’ या भावनेतून नगरकरांनी प्रेम दिलंय!
काल काय झालं आणि कसं झालं याहीपेक्षा येणार्‍या विधानसभा निवडणुकीत नगरकरांनी पुन्हा संग्राम जगताप या त्यांच्या सुखदु:खात सहभागी होणार्‍या माणसाला संधी देण्याचं ठरवलं आहे. त्यांना संग्राम आपला माणूस वाटतोय आणि त्यांच्यातील या भावनेतूनच नगरकरांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केलंय! नगरकरांचे हेच प्रेम आणि आशिर्वाद मला पुन्हा विधानसभेत पाठविण्यास उपयोगी पडेल!

कोणत्याही आणि कितीही चाली खेळा; नगरकरांच्या मनात फक्त आणि फक्त संग्राम जगतापच!
जातीय समिकरणे, त्यातून मतदान हा विषय आणि त्याची पुनरावृत्ती आता पुन्हा होईल असे वाटत नाही. देशाची निवडणूक होती. त्यात काहींच्या मनात असुरक्षीततेची भावना निर्माण झाली असेल, काहींचे गैरसमज झाले असतील. मात्र, आता येणार्‍या विधानसभेसह महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होण्याची सुतराम शक्यता नाही. आपला माणूस, आपल्या मदतीला धावून येणारा, आपल्या शहराचा विकास कोण करु शकेल याचा विचार करत मतदार मतदान करतात. नगरकरांच्या मनात फक्त आणि फक्त संग्राम जगतापच असल्याने आता त्याला शह देण्यासाठी कितीही आणि कशाही चाली खेळल्या तरी काहीही उपयोग होणार नाही.

नगरमध्ये खरी दहशत या कथित टोळीचीच!; त्यांच्यापासूनच नगरकरांना धोका!
दहशत, भितीमुक्त नगर हे जुनेच मुद्दे ही कथीत टोळी पुन्हा- पुन्हा नगरकरांसमोर मांडत आहे. या टोळीच्या हातात शहर गेले तर ही टोळीच दहशत निर्माण करणार हे नगरकरांना आता जाणवू लागले आहे. गेल्या काही वर्षात या टोळीने ज्या पद्धतीने नगरकरांना वेठीस धरण्याचे काम केले ते पाहता खरी दहशत कोणाची हे सांगण्याची गरज राहिलेली नाही. स्वत:चं भलं कसं होईल या चिंतेत कायम असणार्‍यांबद्दल मी काहीच बोलणार नाही अशी कोपरखिळीही आ. जगताप यांनी मारली. मतदान घडते ते प्रेमातून, जनतेचं प्रेम मी अनुभवत असल्याचेही आ. जगताप यांनी ठामपणे सांगितले.

व्यक्तिगत स्वार्थ, त्यांचा त्यांना लखलाभ!
महायुतीत असणार्‍या कोणत्याही मित्रपक्षातील नगर शहरातील पदाधिकारी अथवा कार्यकर्त्याची आपण कधीच वरीष्ठांकडे तक्रारी केलेेल्या नाहीत. काही मंडळींनी स्वत:चा अजेंडा राबवत आली आहेत. त्यांचा व्यक्तीगत अजेंडा राबवता. त्यातून शहरापेक्षा त्यांचा व्यक्तीगत स्वार्थ त्यांनी साधला. तो त्यांंचा त्यांना लखलाभ!

विरोधकांना चांगले वातावरण म्हणत असाल, तर बाहेरच्यांना का बोलावता?
लोकसभा निवडणुकीतील नगर शहराच्या मतदानावरुन कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी तो प्रयत्न बाळबोधच आहे. त्यांनी दावा केल्यानुसार नगर शहरात खरेच जर त्यांच्यासाठी चांग़ले वातावरण निर्माण झाले असेल तर ही मंडळी बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे यांना नगरमधून लढण्यासाठी का गळ घालतात? याचा अर्थ यांना नगर शहरातील वास्तवाची जाणिव झाली आहे. बाहेरच्या नेत्यांना बोलविण्यापेक्षा या मंडळींनी पुन्हाएकदा मैदानात यावे आणि नगकरांच्या मनात त्यांची तीन आकडी मते ओलांडण्याइतकी तरी ताकद आहे का हे दाखवून द्यावे!

चितळे रस्त्यापासून अमरधाम चौक रस्त्याची काळजी घेतलीय!
विकास कामे करताना राजकारण न आणण्याची भूमिका मी पहिल्यापासून घेतली. त्यातूनच चितळे रस्त्यावरील जिल्हा वाचनालय- लक्ष्मीबाई कारंजा- गांधी मैदान- जनकल्याण रक्तपेढी- अमरधाम चौक हा रस्ता देखील घेतला आहे. या रस्त्यावरुन वाहणारे पाणी रस्त्याच्या खालून जावे यासाठी गटर देखील घेतले आहे. कोणी कितीही बढाया मारल्या तरी मी केलेले काम बोलत आले आहे.

एसपी चौक ते पत्रकार चौक रस्ता पूर्णपणे खोदून नवा होणार!
डीएसपी चौक ते पत्रकार चौक हा रस्ता आता पूर्णपणे खोदला जाणार आहे. येथील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्याचे काम प्रशासन लवकरच पूर्ण करेल आणि या कामास प्रत्यक्ष प्रारंभ होईल. यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. केडगाव ते कल्याण हायवे या लिंक रोडसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळवला. टप्प्याटप्प्यात यासाठी मुंजुर्‍या घेतल्या. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही कामे म्हणजे वचनपुर्तीच आहे.

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिराचे काम पूर्णत्वास जाईल
नगरकरांचे ग्रामदैवत असणार्‍या विशाल गणपती मंदिराचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. मंदिराकडे येणारे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे प्रयत्नपूर्वक मी केले आहेत. गणपती मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसविण्याचे काम केले. काटवन खंडोबा ते आगरकर मळा या रस्त्यासाठी राज्य शासनाकडून सात कोटींचा निधी मिळवला. त्याचे काम सुरू होत आहे. विशाल गणपती मंदिर हे नगरकरांच्या श्रद्धेचा भाग आहे. मंदिराच्या कामात मला राजकारण आणायचे नाही. गेली अनेक वर्षापासून या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम अपूर्ण असल्याचे वास्तव असले तरी हे काम लवकरच पूर्ण जाईल असा आशावाद आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

कल्याण हायवेवर मोठ्या पुलाच्या कामाने शिवाजीनगर परिसराला दिलासा!
नेप्ती नाका चौकातून कल्याण रस्त्याने जाताना सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जायचा. याशिवाय हा पूल खूपच खराब झाला होता. त्यामुळे येथे कायमच मोठे खड्डे राहायचे. कल्याण रस्त्यावरील अमरधाम मागील पुलासाठी मोठा पाठपुरावा केला. नॅशनल हायवेमधील हा प्रोजेक्ट असला तरी त्यासाठी गडकरी साहेबांकडे पाठपुरावा केला आणि त्यास यश आले. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होईल.

वाडियापार्कसाठी साडेपंधरा तर बसस्थानकांसाठी २३ कोटींचा निधी
नगर शहरामध्ये वाडीयापार्क भव्य असे क्रीडा मैदान आहे. नगरच्या खेळाडूंनी राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे वाडियापार्कमध्ये खेळाडुंना विशेष सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी अद्यावत सुविधा मिळण्यासाठी १५.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच बसस्थानके प्रशस्त असावीत यासाठी माळीवाडा बसस्थानकासाठी १६ कोटी तर सावेडी बसस्थानकासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.

रस्त्यांसाठी २४४ कोटींचा तर सीना सुशोभिकरणासाठी सात कोटी
शहरातील डीपी रस्त्यासाठी १५० कोटींंचा निधी आणला आहे. तसेच इतर महत्वाच्या रस्त्यांसाठी ९४ कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे. दोन म्युझिकल फाऊंटनची उभारणी नगरमध्ये होत आहे. यासह सीना नदी सुशोभिकरणासाठी सात कोटींचा निधी मंजूर करुन आणला असून नगर-पुणे रस्त्यालगत आनंद ट्रेडिंग कंपनी जवळ व अमरधामजवळ ऑक्सिजन पार्कची उभारणी होणार आहे.

जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून शहराची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे समाधान!
जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून नगर शहराची ओळख. मात्र, मुख्यालय वाटावे अशा कोणत्याही सुविधा आणि विकास कामे नगरमध्ये नव्हती याच्या वेदना मला होत होत्या. आमदार झाल्यापासून नगर शहर हे राज्यातील अन्य शहरांप्रमाणे व्हावे, येथील पायाभूत सुविधांच्या जोडीने येथील जनतेला सुविधा मिळाव्यात अशी भूमिका माझी सातत्याने राहिली. नगरसेवक आणि पुढे महापौर म्हणून काम करताना मी नगर शहराचा एक आराखडा डोळ्यासमोर ठेवला. जिवाभावाच्या मित्रांसोबत त्याबाबत चर्चा करताना विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. महापालिकेच्या निधीतून जे काम शक्य नाही ते काम राज्य शासनाच्या निधीतून मार्गी लावण्याचा सपाटा लावला. त्यातून आज नगर शहराची खेडं ही ओळख पुसण्याचे काम झाले आहे. नगर शहराच्या वैभवात भर घालणारा उड्डाणपुल होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करताना केंद्राचा निधी आणण्यासाठी तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील यांच्यासोबत पाठपुरावा केला. बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने आता नगर शहरातील अवजड वाहतूक आणि त्यातून होणारे अपघात थांबले आहेत. मुख्यालयास साजेसे असं शहर उभे राहिल्याचे समाधान नक्कीच असून यासाठी नगरकरांनी सहकार्य केल्याची भावनाही आ. जगताप यांनी व्यक्त केली.

नगरकरांनी मुलाप्रमाणे, भावाप्रमाणे प्रेम दिलं,
त्यातून उतराई होण्यासाठीच आमदारकीचा वापर!
नगर शहरासाठी वेगळे काहीतरी करताना तरुणांना संघटीत करण्याचे काम हाती घेतले. नगरसेवक, महापौर म्हणून काम करताना युवकांसह थोरामोठ्यांनी विश्वास दाखवला. त्यातून काम करण्याची उर्जा मिळत गेली. आपण जनतेचे सेवक आहोत आणि त्याच भावनेतून या जनतेची पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे सेवा करावी ही शिकवण आम्हाला आमचे आजोबा बलभिमराव जगताप यांनी घालून दिली. त्यांच्या पश्चात विधान परिषदेच्या माध्यमातून सलग दोनवेळा संधी मिळालेले आमदार अरुणकाका यांनी आमच्यावर तेच संस्कार केले. सामाजिक उत्तरदायित्व जपण्याची आणि जनतेचं आपण देणं लागतो ही भावना जोपासण्याची शिदोरी आमच्या कुटुंबाला कायम मिळाली. तीच शिकवण आणि तीच शिदोरी घेऊन मी आणि माझे सहकारी नगर शहरात काम करत आहोत. नगरकरांनी त्यांच्या कुटुंबातील मुलगा या नात्याने, काहींनी त्यांचा भाऊ या नात्याने तर काहींनी त्यांचा सहकारी या नात्याने मला समाजाची सेवा करण्यासाठी ताकद देण्याचे काम केले. त्यांचे हे आशिर्वाद, शुभेच्छा फक्त आणि फक्त संग्राम जगताप याच्याच वाट्याला आल्यात आणि म्हणूनच ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडू शकलो. या सर्व घटकांचा विश्वास जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत तरी मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माझ्या रक्ताचा थेंब न थेंब नगरकरांसाठी खर्ची पडेल आणि त्यातूनच नगर शहराचा नवा सुर्योदय करण्याचे काम माझ्या हातून आणखी जोमाने होईल असा आशवाद आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...