पुणे / नगर सह्याद्री –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या की स्वबळावर, याचा निर्णय स्थानिक पातळीवरील भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. “महायुतीतून निवडणूक लढवण्याचा आमचा प्राधान्याने प्रयत्न आहे. मात्र, युतीला अडचणी येणाऱ्या ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढविल्या जाणार आहेत. पण मित्रपक्षांवर तिखट टीका करू नये, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.
पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर बोलताना फडणवीस यांनी पक्षाची भूमिका मांडली.
ते म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरातील पक्षाच्या खासदार, आमदार, अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आढावा बैठका घेतल्या जात आहेत. भाजपसाठी सध्याची परिस्थिती सकारात्मक आहे. जिथे शक्य असेल तिथे महायुतीतून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असून, त्यात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही.”
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी किंवा नंतर मदत –
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. “पहिल्या टप्प्यातील मदत वाटप पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी ही मदत देण्याचा प्रयत्न आहे. काही शेतकऱ्यांना दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मदत मिळू शकेल,” असे त्यांनी नमूद केले.
‘प्रबळ’ कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश –
भाजपमध्ये प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, “इतर पक्षांतील प्रबळ कार्यकर्ते किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास तयार असतील, तर त्यांना पक्षात सामावून घेतले जाईल. भाजपचे कार्यकर्ते अशा नव्या सहकाऱ्यांना समजून घेतात आणि सामावून घेतात. यामुळेच पक्षाची वाढ झाली आहे. काही ठिकाणी नाराजी निर्माण होऊ शकते, पण अशा वेळी समजावून सांगितले जाते आणि कार्यकर्ते ते स्वीकारतात,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत स्थानिक निवडणुकांसाठी रणनीतीवर चर्चा झाली असून, महायुतीच्या एकजुटीसह पक्ष स्वबळावरही निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले.