संगमेनर । नगर सहयाद्री:-
विखे-थोरात गटातील संघर्षाचा अखेर भडका उडाला. धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्द वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान वसंतराव देशमुख यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर जयश्री थोरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जयश्री थोरात म्हणाल्या, काल जे काही घडलं, ते अतिशय वाईट आहे, कुणालाही न शोभणारी आहे, तुम्ही म्हणतात राजकारणात ५० टक्के आरक्षण महिलांना द्यायचं. पण जर असं बोलणारे लोकं असतील तर महिलांना का राजकारणात यावं? मी काय वाईट करत होते? मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते. माझ्या वडिलांसाठी युवा संवाद यात्रेत फिरण्याचं काम करत होते. प्रत्येक माणसाला भेटण्याचं काम मी करत होते. असं काय वाईट केलं होतं, की माझ्याबद्दल एवढं वाईट बोललं पाहिजे? अशी नाराजी व्यक्त करत जयश्रीताई यांनी सवाल केला.
जे वक्तव्य करण्यात आलं ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? तुम्ही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात. भाषणामध्ये तुम्ही किती गलिच्छ आणि खालच्या पातळीवर बोलताय. त्यांच्या वयाला आणि कुणालाच हे शोभणारं नाहीय, असं त्या संतप्त झाल्या. हे बरोबर आहे की ते विरोधक राहिलेले आहेत, पण विरोधकाला देखील एक पातळी असते.
त्या एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुमच्या मुलीच्या, तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलताय. ते त्यांना शोभणारं नाहीय.माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे. त्यांना सरळ करण्याचं काम माझ्या आजोबांनी केलं होतं, मध्यंतरी आमच्या महिलांनी देखील त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. अशा माणसाला ते लोकं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान देतात, तर मला प्रश्न त्यांच्याबाबत देखील पडत आहे.