मुंबई / नगर सह्याद्री :
या वर्षी मान्सूनचा प्रारंभ अपेक्षेपेक्षा लवकर झाल्याने २५ मे रोजीच तो दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. ही तारीख सामान्य वेळेपेक्षा तब्बल १० दिवस आधीची आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २७ मेपासून मान्सूनचा वेग कमी होणार आहे आणि त्यामुळे राज्यातील हवामानात लक्षणीय बदल दिसून येणार आहेत.
२७ मेपासून बहुतांश भागांत हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. तापमानात काही प्रमाणात वाढ होईल आणि पावसात खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात मे महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रामुख्याने कोरडे हवामान राहणार असून, ही स्थिती किमान ५ जूनपर्यंत टिकू शकते. यामुळे ५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, यंदा अनेक भागात दमदार वादळी पूर्वमान्सून पावसामुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाच्या तयारीसाठी उत्साह निर्माण झाला आहे. मात्र, हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार पावसात काही काळ खंड पडणार असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून किंवा लवकर पेरणी करण्याच्या घाईमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी पावसाचा पहिला भरवसा पक्का झाल्याशिवाय पेरणी अथवा लागवड सुरू करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असून चुकीच्या नियोजनामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी योग्य हवामान सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे. मान्सूनची गती मंदावणार असली तरी, हवामान विभाग सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आगामी दिवसांत पुढील अपडेटसाठी अधिकृत हवामान अहवालांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.