मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील खुल्दाबादमध्ये असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरून वाद पेटला आहे. काही संघटनांनी ती हटवण्याची मागणी केली आहे. नागपुरात यावरून उसळलेल्या हिंसाचारात अनेक वाहनांची जाळपोळ झाली असून, पोलिसांवर दगडफेकही झाली. पोलिसांनी आतापर्यंत 50 जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रात सध्या या कबरीवरून राजकारण पेटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खरपूस समाचार घेतला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?, औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाच तरी ठेवा, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला. तसेच औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेलं कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.