सुपा | नगर सह्याद्री
अध्यात्म म्हणा किंवा ईश्वरनामाचा जप म्हणा, त्याची प्रचिती केव्हा येईल हे सांगता येत नाही. आस्तिक लोक हे खरे आहे असे मानतील तर नास्तिक त्याला अंधश्रद्धा मानतील. हा ज्याचा त्याचा विषय आहे; परंतु घटना घडली मात्र खरी. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हा श्री स्वामी समर्थांच्या वचनाचा प्रत्यय रांधे (श्रीहरिवाडी) या गावात आला. श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात भजनाचा कल्लोळ सुरू झाला आणि जबड्यात पाय पकडून शेतकऱ्याला जखडून ठेवणाऱ्या बिबट्याने पाय सोडून धूम ठोकली. ‘श्री स्वामी समर्थ’ हेच सत्य असल्याचे विचार संबंधित शेतकऱ्याच्या मनात तरळून गेले असतील का अशीच चर्चा जनमानसात चालू आहे.
गेल्या 23 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता आपल्या मळ्यातील विद्युत पंप बंद करण्यासाठी सुरेश पंढरीनाथ आवारी (वय-45) हे शेतकरी गेले असता दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जखमी केले. ही घटना रांधे गाव (श्रीहरिवाडी) या ठिकाणी घडली. सुरेश आवारी हे विद्युत मोटर बंद करून घरी येत असताना कालव्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने चालू वाहनावरील सुरेश आवारी यांच्यावर झडप मारली व त्यांना खाली पाडले. त्यांचा पाय आपल्या जबड्यात पकडून त्यांना कालव्यामध्ये फरपटत नेले. श्री. आवारी यांनी आपल्या हातातील ‘विजेरी’ने (टॉर्च) बिबट्यावर प्रहार केला परंतु बिबट्याने हूं की चूं न करता त्यांना तसेच दाबून ठेवले. अन् तेवढ्यात ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’चे दर्शन झाले. त्याच क्षणी रांधे (माळवाडी) येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान या ठिकाणी दररोजचे नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजताचे संगीत भजन चालू झाले.
टाळ, मृदंगाचा आवाजाचा कल्लोळ कानावर पडताच त्या आवाजाने बिबट्या बिथरला आणि त्याने आपल्या जबड्यात असलेला सुरेश आवारी याचा पाय सोडला आणि पळ काढला. बिबट्या पळताच लगेचच सुरेश आवारी यांनी आपल्या पत्नीला फोन केला. पत्नी मनीषा आवारी यांनी बाजूला असलेला दीर नवनाथ आवारी, अनिल आवारी, संदीप गहाणडुले यांच्या मदतेीने घटनास्थळी धाव घेतली. नंतर अनेक ग्रामस्थ जमा झाले. सुरेश आवारी यांना वेदना असह्य झाल्यामुळे त्यांनी तत्काळ वनरक्षक श्रीहरी आठरे आणि वनरक्षक उमेश खराडे यांच्याशी संपर्क केला.
त्यानंतर लगेचच वनरक्षक उमेश खराडे आणि वनरक्षक श्रीहरी आठरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कशाचीही वाट न पाहता राहुल भास्कर आवारी यांच्या खाजगी वाहनामध्ये जखमी सुरेश आवारी यांना अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. श्री. यांच्यावर पुढील उच्चार सुरू आहेत. ‘देव तारी त्याला कोण मारी’ यांची प्रचिती मात्र श्री. आवारी यांच्याबाबतीत आली. संबंधित घटनास्थळी सरपंच संतोष काटे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष रांधे, भास्कर आवारी, गोरख दत्तू आवारी, साईनाथ झिंजाड, संजय आवारी, दिलीप आवारी, विठ्ठलनाना आवारी, सोनल अनिल आवारी, अनिता खोसे, शीतल पिंगळे, सुनीता आवारी, शांताबाई आवारी, प्रमिला आवारी आदी उपस्थित होते.
हिंस्र प्राण्याचा हल्ल्यानंतरची लस उपलब्ध नसल्याची खंत
या एक महिन्यांमध्ये बिबट्याने मनुष्यावर हल्ला करण्याच्या घटना साधारणता तीन ते पाच, तसेच पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ल्याच्या 20 ते 25 घटना घडल्या आहेत. घटनेवरून श्री स्वामी समर्थ देवस्थानचे संस्थापक अनिल रामचंद्र आवारी यांनी खंत व्यक्त केली की, आज अळकुटी आणि पंचक्रोशी मध्ये बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बिबट्या आणि इतर हिंस्त्र प्राणी हल्ला झाल्यावर त्यासाठी उपचार म्हणून लागणारी लस (इंजेक्शन) घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. साधारणता 70 ते 80 किलोमीटरचा हा प्रवास आहे. यावेळेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो. रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. आरोग्य खाते अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. बिबट्याच्या हल्ल्याने अनेक जीव शेकऱ्यांना गमावलेले आहेत. पारनेर, अळकुटी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये संबंधित लस उपलब्ध करून द्यावी जेणेकरून रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे श्री. आवाारी म्हणाले.