पुणे। नगर सहयाद्री
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांचे २० जानेवारी पासुन जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथुन महामोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
महामोर्चाचा आज पाचवा दिवस आहे. हे वादळ नगर, रांजणगाव येथून घोंघावत पुणे, लोणावळ्य़ाकडे सरकले असून शेकडो मराठे या आंदोलनात एकवटू लागले आहे. हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगव्या टोप्या, उपरणे, कपाळी गंध, जय भवानी जय शिवाजीचा गजर, एक मराठा, लाख मराठासह मराठा आरक्षणाच्या मागणीचा पुकारा…अन् जरांगेंचे नेतृत्वामुळे मराठा आरक्षण महामोर्चाला ऊर्जा निर्माण झाली आहे. यावेळी जरांगे पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.
जरांगे म्हणाले, सरकारने बोलणे बंद केले, तर आम्हीही बंद करू शकतो. आम्ही नेहमीच गोडीची भाषा करू. पण लक्षात ठेवा आम्ही मराठे आहोत. तुम्ही काही ठरवू शकता, तर आम्हीही ठरवू शकतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सध्या वेळ नाही. ते गडबडीत आहेत, बिझी आहेत. गोरगरिब मराठ्यांची त्यांना आवश्यकता नाही. ती मोठी माणसे आहेत. आपल्याकडे कशाला लक्ष देतील.
मुंबईत अजूनही उपोषणाला परवानगी मिळालेली नाही. कायद्याचा सन्मान राखून आपण अर्ज केला. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या उपोषणाला परवानगी देत नसाल, तर ते अयोग्य आहे. परवानगी मिळाली नाही, तरी मी उपोषणाला बसणारच. देशात लोकशाही आहे. हे लोकांचे राज्य आहे. आमची मुंबई आहे. त्यामुळे उपोषणापासून आपल्याला कुणी रोखू शकत नाही. अस म्हणत मला गोळ्या घातल्या, तरी आता मी मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.