अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरघोस निधी देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून दिवाळीपूवच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार असल्याची माहिती आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. भाजप सरकारच शेतकऱ्यांना मदत करु शकते असे सांगत विरोधकांना आ. कर्डिले यांनी टोला लगावला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्हीआयपी सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विश्वनाथ कोरडे, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रभाजी सूळ, सरचिटणीस चंद्रशेखर करमाळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. ही मदत दिवाळीपूवच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच अनेक भागातील पंचनामे बाकी असून तेही येत्या दहा-बारा दिवसात पूर्ण होतील. राज्यातील 29 जिल्ह्यांती 253 तालुक्यांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसकट मदत म्हणून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.