मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले असले तरी ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभे राहत आहे. अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे जमा केले आहेत. अनेक गावात मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. राज्यात ईव्हीएमविरोधात रान पेटत असतानाच दुसरीकडे पुण्यात 95 वर्षींय समाजसेवक बाबा आढाव यांनी या सर्व प्रकाराविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. या विधानसभा निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमवर त्यांनी संशय व्यक्त केला. शरद पवार यांच्यानंतर आज अजित पवार यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. त्यावेळी बाबा आढावांनी मोठा इशारा दिला.
लोकसभा-विधानसभा निकालात इतका फरक कसा?
ईव्हीएमच्या घोटाळ्यावर बाबा आढाव यांनी घाणाघात केला. ईव्हीएमचं निराकरण झालं पाहिजे. आम्हाला दाबायचा प्रयत्न करू नका. आम्हाला दाबायचा प्रयत्न केला तर असं होणार नाही. माझ्यासारखी माणसं मरण पत्करतील पण दाबले जाणार नाही. आम्हाला हे स्वातंत्र्य असं नाही मिळालं. आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. दोन तीन प्रश्न आहेत. त्याचं निराकरण करा. लोकसभा आणि विधानसभेतील मतदान आणि निकालात फरक कसा. याचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलन निकाराने पुढे जाईल
आम्ही शत्रू नाही. आपण मित्रच आहोत. पण प्रश्नाचं निराकरण झालं पाहिजे. मी नमस्कार म्हणत नाही. जिंदाबाद म्हणतो. दादा तुम्ही आलात मी दोनदा जिंदाबाद म्हणतो. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद देतो, आढाव हे दादांना म्हणाले. मला वाटतं काही प्रयत्न निघाला नाही तर आम्ही हे आंदोलन शांततामय मार्गाने पुढे नेईल. ते वाया जाऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रसंगी मरण पत्करेल
ईव्हीएममधील गैरप्रकार सिद्ध करण्याचे काम आपलं आहे. घटनेला 75 वर्षे होतायेत. मी आत्मक्लेश सुरू केला आहे. हे सरकार कुणालाच जुमानतच नाही. मतपेटीत जे झालं, त्याचा छडा लागलाच पाहिजे. याचं निराकरण झालं पाहिजे. हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला तर आम्ही माघारी हटणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील पण मागे हटणार नाहीत, असा इशाराचा ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी दिला.