अहिल्यानगर । नगर सहयाद्री: –
महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासूनच हवामानात मोठा बदल जाणवत आहे. उकाड्याच्या झळा आणि दमट हवामानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात येत्या काळात विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, १ एप्रिलला विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही या हवामान बदलाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्याच्या उत्तर भागात पावसाचा जोर अधिक असणार आहे. मंगळवारी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ तर धुळे जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी, असं प्रांताधिकारी किरण सावंत आणि तहसीलदार मिलिंद वाघ यांनी सांगितलं आहे. जेव्हा मेघ गर्जतात, विजा चमकतात किंवा वादळी वारा वाहतो, तेव्हा झाडाखाली किंवा झाडांच्या जवळ थांबू नका. विजांपासून वाचण्यासाठी सुरक्षित जागी जा. वादळात आणि विजा चमकत असताना टीव्ही, फ्रिजसारखी विद्युत उपकरणं वापरू नका. विजेच्या वायर्स किंवा सुवाहक गोष्टींना हात लावू नका.
मोकळ्या मैदानात, झाडाखाली, टॉवरजवळ, विद्युत खांबाजवळ, धातूच्या कुंपणाजवळ किंवा ट्रान्सफॉर्मरच्या आसपास थांबू नका. लटकणाऱ्या वाऱ्यापासूनही दूर रहा. जाहिरात फलक कोसळून काही बरं-वाईट होऊ नये म्हणून त्यांच्या जवळही उभं राहू नका. धोकादायक जागी सेल्फी काढण्याचा मोह टाळा. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी आधीच तयारी करावी. शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. बाजारात माल विकायला नेला असेल किंवा तसं ठरवलं असेल, तर तो खराब होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
एकीकडे हवामान विभागाने राज्याच्या बहुतांश भागांत वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे .तर दुसरीकडे उन्हाळ्याबाबत देखील चिंता व्यक्त केली आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत किमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि दीर्घकालीन असण्याची शक्यता आहे.