अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांच्यातील वाद पेटला आहे. धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वाद चिघळला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान या घटनेचा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील वक्तव्याचा निषेध केला आहे. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची, अशी टीका सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
सुजय विखेंच्या सभेत बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा खळबळ उडाली आहे. काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून संतप्त कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी गाड्यांना आग लावली आहे. पोलीस स्टेशनवर काँग्रेस कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले होते. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनेनंतर झालेल्या राड्याप्रकरण विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसच्यावतीने आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांची प्रतिक्रिया काय?
सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे. आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे. या वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची. बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच.