अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये जनमानसाच्या मनात निर्माण केलेल्या स्थान आढळ आहे. त्यांनी शहराच्या सर्व घटकातील नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आयुष्यभर काम केलं. शहराची लाईफ लाईन असणाऱ्या जुन्या महानगरपालिकेच्या वास्तूचे नूतनीकरण करून तिला “हिंदू धर्मरक्षक जननायक स्व. अनिलभैय्या राठोड भवन” असं नाव देण्याची जाहीर मागणी, शिवसेना उभाठाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी पुन्हा केली आहे.
स्वर्गीय राठोड यांच्या 75 व्या जयंती दिनानिमित्त शिवालय येथे शहर शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, डॉ. श्रीकांत चेमटे, किरण बोरुडे, महावीर मुथा, स्मिताताई अष्टेकर, मनोज गुंदेचा, विलास उबाळे, उषाताई भगत, शैलाताई लांडे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, मनोज चव्हाण, विनोद दिवटे, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर, दीपक काकडे, देवराम शिंदे, गोरख कारले, विनोद शिरसाठ आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे म्हणाले की, यापूर्वी देखील ही मागणी मी केली होती. मात्र अजूनही ती प्रलंबित आहे. मनपाने याची दखल घ्यावी. स्व. अनिलभैय्या यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक नेते, शिवसैनिक, महापौर, सभापती, नगरसेवक घडविले. त्यांचं नाव मनपाच्या या वास्तूला लागणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली असेल.
सुरुवात करतोय… तुमचा आशीर्वाद असू द्या भैय्या
शिवालयात अनिलभैय्या यांच्या प्रतिमे समोर नतमस्तक होत किरण काळे यांनी ‘मी सुरुवात करतोय, भैय्या तुमचा आशीर्वाद असू द्या’ असे भावनिक होत साकडे घातले. काळे म्हणाले, शिवसेनेच्या शहर प्रमुखपदाची जबाबदारी दोन दिवसांपूर्वी माझ्यावर पक्षाने सोपविली. आज भैय्यांना अभिवादन करून कामाचा श्री. गणेशा करत आहे. भैय्यांना ज्या पद्धतीच काम अभिप्रेत होतं तसं काम सगळ्या नव्या जुन्यांना बरोबर घेऊन करत शिवसेना पुन्हा एकदा मजबूत करणार आहे.