पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यामध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. असे दिसत असले तरी योजनेत अनियमितता दिसून येत आहे. योजनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर खाजगीमध्ये माती व मुरूम विक्री सुरु असल्याच्या तक्रारी देखील समोर येत असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली.
पारनेर येथील विश्रामगृहावर आ. दाते यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. त्यांनी स्वयंसेवी संस्थांना या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आदेश यावेळी दिले. आमदार दाते म्हणाले, राज्य शासनामार्फत ही कामे मंजूर झाले असून नाम व टाटा मोटर्स सोडता इतर स्वयंसेवी संस्था राज्य शासनाचा कुठेही उल्लेख करत नाहीत ती गंभीर बाब आहे. इतर स्वयंसेवी संस्था योजनेमध्ये काम करत आहेत.
त्यांनी गाळ विक्रीचा बोगस धंदा मांडला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी भाजप नेते विश्वनाथ कोरडे, माजी जि प सदस्य वसंत चेडे, भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, दत्ता नाना पवार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कृषी विभाग, जलसंधारण विभाग स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
शासन एकरी 15 हजार रुपये देणार
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये माती टाकण्यासाठी व वाहून नेण्यासाठी शासन हे अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकरी 15000 रुपये अनुदान डीबीटी द्वारे देणार आहे असे आमदार काशिनाथ दाते यांनी स्पष्ट केले.
गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही
गाळयुक्त शिवार ही महायुती शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये अनियमितता दिसूनआल्याने या संदर्भातच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. अधिकारी व स्वयंसेवी संस्थांना सूचना केल्या असून गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही.
– विश्वनाथ कोरडे, राज्य कार्यकारणी सदस्य, भाजप