मुंबई। नगर सहयाद्री
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. आम्ही तिन्ही पक्ष मिळून याचा निर्णय घेऊ आणि यात मोठा रोल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी वरील दावा केला. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सर्व नेते आणि कार्यकर्ते आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री करण्याचे म्हणतात.
ही गोष्ट संख्याबळावर ठरत असली तरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते तिन्ही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतील. शेवटी माझा नेता मोठा झाला पाहिजे हे कार्यकर्त्यांचे मोटिवेशन असते, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे जेव्हा आमचे नेते म्हणतात, तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना आनंद वाटतो. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांसमोर सांगितले की आपल्याला अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे आहे, तर टाळ्या वाजवतील पण तुलनेने कमी वाजवतील. तो उत्साह येणार नाही. शेवटी त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही वाटते, की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे; पण अल्टिमेटली आम्ही तिघेही याचा निर्णय घेऊ आणि यात मोठा रोल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल, असे फडणवीस यांनी अधोरेखित केले.