spot_img
अहमदनगरआरक्षण मिळेपर्यंत आता माघे हटणार नाही; भुजबळांमुळे...; सरकारने तसे केले तर...

आरक्षण मिळेपर्यंत आता माघे हटणार नाही; भुजबळांमुळे…; सरकारने तसे केले तर…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे नगर शहरात दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी व मराठा समाज एकमेकांच्या मदतीला धावून जातात. एकमेकांना बैल, औत आदींसह अनेक गोष्टींची मदत करतात. एकमेकांच्या लग्नात आम्ही वाढायला असतो, असे आमचे प्रेम आहे. परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे दोन समाजात तेढ झाल्याचे दिसते. असे असले तरी गावोगावी, खेडोपाड्यात मात्र आम्हाला ओबीसींचा पाठिंबा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ’थोडासा धीर धरा’ असे वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारले असता जरांगे म्हणाले, आता धीर किती धरायचा तेच कळेना. त्यांनी एकदा समोर येऊन बोलावे, त्यांना सात महिन्याचा वेळ दिला तरी काही झाले नाही. सात महिन्यात ते कधी भेटायलाही आले नाहीत. त्यामुळे त्यांनी येऊन एकदा भेटावे आणि दूध का दूध व पाणी का पाणी करावे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार का, असे विचारता ते म्हणाले, मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न सुटला की त्यांच्यासाठीही लढा देणार आहे. तसेच धनगर बांधवांसाठीही लढा देणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेला मोर्चा रविवारी (दि. २१) अहमदनगर जवळील बाराबाभळी (ता. नगर) येथे आला. रात्रीचा मुक्काम बाराबाभळी येथे होता. रात्री साडेबारानंतर जरांगे पाटील यांची तेथे सभा झाली. यावेळीही त्यांनी आरक्षण प्रश्नी सरकारला इशारा दिला.

बाराबाभळीच्या मदरशात जरांगे पाटील यांनी मुक्काम केला. बाहेर थंडी असल्याने मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची व्यवस्था केली होती. रविवारी रात्री मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजन घेतले. मदरशातील विद्यार्थ्यांनी त्यांना सेवा दिली. जरांगे यांना मदरशाच्या विश्वस्तांनी मराठी कुराणची प्रत भेट दिली. सोमवारी देशभरात अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात आहे.

आम्ही देखील या उत्साहात सहभागी होणार असल्याचे जरांगे म्हणाले. आमच्या पायी दिंडीत आम्ही हा आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे म्हणाले. आम्ही देखील रामभक्त असून, आम्हालाही याचा आनंद आहे. मात्र, सोबतच आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी आरक्षणाचा मुद्दाही तेवढाच महत्वाचा असल्याचे जरांगे म्हणाले.

वकीलांकडून मराठा बांधवाना ३ टन सफरचंद
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा अनगरमध्ये आल्यावर शहर संघटनेच्या वतीने पदयात्रेत सहभागी झालेल्या हजारो मराठा बांधवाना तब्बल ३ टन सफरचंद व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. उड्डाणपुलाखाली नगर महाविद्यालया जवळ वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे, उपाध्यक्ष अ‍ॅड.महेश शेडाळे, सचिव अ‍ॅड.संदीप शेळके यांच्या सह वकिलांनी फळांचे वाटप केले. यावेळी वकील संघटनेचे महिला सहसचिव अ‍ॅड.भक्ती शिरसाठ, खजिनदार अ‍ॅड. शिवाजी शिरसाठ, सह सचिव अ‍ॅड.संजय सुंबे, कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.अमोल अकोलकर, अ‍ॅड.सारस क्षेत्रे, अ‍ॅड.विनोद रणसिंग, अ‍ॅड.देवदत्त शहाणे, अ‍ॅड.शिवाजी शिंदे, अ‍ॅड.रामेश्वर कराळे, अ‍ॅड.अस्मिता उदावंत, माजी अध्यक्ष संजय पाटील, माजी उपाध्यक्ष राजाभांऊ शिर्के, गौरव दांगट, महेश काळे, अमितेश झिंजुर्डे, विलास चितळे, राजेश कावरे, कृष्णा झावरे, सुरेश भोर, संदीप बुरके, नवाज शेख, वासिम सय्यद, अनुराधा येवले, वैभव पवार, सचिन तरटे, अभिजित कोठारी आदींसह वकील उपस्थित होते.

आ. जगतापांनी धरला ठेका
लाखोंच्या मराठा बांधवांसह मनोज जरांगे शहरात दाखल होताच आ. संग्राम जगताप मोर्चात सहभागी झाले. त्यांनी मनोज जरांगे यांचा पुष्पहार घालून स्वागत केले. आमदार जगताप मोर्चात सहभागी होताच तरुणांनी त्यांना उचलून घेत नृत्य केले. त्यांनीही डीजेच्या ठेयावर नृत्य केले. त्यानंतर रॅली पुढे येताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. जगताप व मनोज जरांगे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आ. जगताप यांच्याकडून जंगी स्वागत
जरांगे पाटील नगरमध्ये दाखल होताच आ. संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. सोमवारी (दि. २२) मराठा मोर्चाने नगरमधून मुंबईकडे कूच केलीं. त्यांच्या स्वागताची तयारी आमदार जगताप यांनी केली होती. मराठा मोर्चेकरांसाठी अल्पोपहार, फलाहार, पाण्याची व्यवस्था केली. गर्दीची काळजी घेऊन शहरात सहा ठिकाणी प्रशस्त मंडप टाकले होते. स्टेटबँक चौक, चांदणी चौक, एडीसीसी बँक, अरुणोदय हॉस्पिटल, राजयोग हॉटेल, आमदार जगताप यांचे कार्यालय आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.

तगडा पोलिस बंदोबस्त
दोन अप्पर पोलिस अधीक्षक, ८ पोलिस उपअधीक्षक, ३६ पोलिस निरीक्षक, ९८ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, ११८४ पुरुष पोलिस कर्मचारी, ५० महिला पोलिस कर्मचारी, ४३ वाहतूक शाखेचे कर्मचारी, दोन आरसीपी प्लाटून, एक यूआरटी प्लाटून, दोन एसआरपीएफ कंपन्या, एक सीआयएसएफ कंपनी, दोन बीडीडीएस पथके असा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

पाथर्डीत भव्य स्वागत
रविवारी (दि. २२) दुपारी हा मोर्चा पाथर्डी तालुयातील आगसखांड शिवारात जेवणासाठी थांबला. सकाळी मिडसांगवी येथे जरांगे पाटील यांचे आगमन झाले. तेथे मिडसांगवीसह भालगाव, खरवंडी कासार, मुंगुसवाडे, ढगेवाडी येथील ग्रामस्थांनी आंदोलकांना अल्पोपहार दिला. येळी, भूते टाकळी, आगसखांड फाटा येथे आ. मोनिका राजळे यांनी स्वागत केले. पाथर्डीत आगमन होताच जरांगे पाटील यांच्यावर सतरा जेसीबीतून फुलांचा वर्षाव करून भव्य हार घालण्यात आला. त्यानंतर त्यांचा ताफा माळीबाभुळगाव, तिसगाव, करंजी मार्गे रवाना झाला.

सुपे येथे लापशी, पुलावाचा बेत
सुपे येथे पाच लाख मराठा बांधवांच्या दुपारच्या जेवणाची जय्यत तयारी केली. सरदार शाबुसिंग पवार मैदानावर ही व्यवस्था करण्यात आली. लापशी, पुलाव असा बेत करण्यात आला. दुपारच्या जेवणाची, बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचे टँकर मैदानावर सज्ज होते. तब्बल पाच लाख आंदोलकांना लापशी व पुलावचे भोजन देण्यात आले. ठेचा भाकरी, चटणी-चपाती या पदार्थाचाही यात समावेश आहे. विविध समाज बांधवांनी एकत्र येत बूंदी, चिवडा या खाद्य पदार्थाचे नियोजन केले.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...