आंतरवाली सराटी। नगर सहयाद्री-
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बोलवलेल्या एकदिवसीय विशेष अधिवेशन एकीकडे सुरू झाले असतानाच दुसरीकडे अधिवेशनात मांडलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या कायद्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सगेसोयरेची अधिसूचना पाळायचीच नव्हती, तर मग काढलीच कशाला? असा परखड सवाल करत त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवून रस्त्यावर उतरू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ओबीसींमध्ये जे आमचे आरक्षण आहे ते आम्हाला हवे. सगेसोयर्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हायला हवी. ते सोडून तुम्ही दुसराच विषय अधिवेशनात घेत आहात. वेगळे आरक्षण १००-१५० जणांना लागू पडेल फक्त. सगेसोयर्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करायचीच नव्हती, तर मग ती अधिसूचना कशाला काढली? तुम्ही लोकांना वेड्यात काढता का?, असे प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.
सगेसोयर्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, ही मूळ मागणी आहे. त्यावर तुम्ही चर्चाच करणार नसाल तर हे अधिवेशन घेतलेच कशाला? या अधिवेशनाची आम्हाला गरजच काय? ज्याची मागणीच नव्हती तेच आरक्षण आम्हाला देत आहात? टिकणार नसलेले आरक्षण तुम्ही देता. ईसीबीसीमध्ये जे झाले तेच आताही पुन्हा होणार.
त्या मुलांच्या अजूनही नियुक्त्या झालेल्या नाहीत. हे आरक्षण तुम्ही देणार, हे राज्यापुरते आहे. हे टिकणार नाही. मागे ७ वर्षें आम्ही आंदोलन केले. आता चार वर्षांपासून हे चालू आहे. म्हणजे आमच्या दोन पिढ्या आंदोलनात चालल्या आहेत. लोकांची मागणी आहे की ५० टक्क्यांच्या आत ओबीसींमध्ये आरक्षण द्या. तीन महिन्यांपूर्वी तुम्हीच ठरवता की सगेसोयर्यांचा कायदा बनवायचा.
तुमचेच लोक येतात, तुमचेच मंत्री येतात, सगेसोयर्याची व्याख्या तयार करतात. त्यात आरक्षण देण्याचे तुमचेच लोक सांगतात. आता विशेष अधिवेशनात तो मुद्दा घेणार नसाल तर बोलवले कशाला ते अधिवेशन? करोडो मराठा रस्त्यावर आला, त्याची मागणी काय आहे हे तुम्हाला कळत नाही का? मराठ्यांच्या पोरांचे मुडदे पडलेत यासाठी. तज्ज्ञ, अभ्यासक त्यांना सांगून थकलेत. ओबीसींचे आरक्षण आम्हाला द्या हा आमचा हट्ट नाही.
आमचे हक्काचे आरक्षण तिथे आहे, ते आम्हाला पाहिजे. तुम्ही सगेसोयर्याचा विषय घेऊ नका, उद्या मी आंदोलनाची दिशा ठरवतो. मराठ्यांचा एकही माणूस तुम्हाला घरात दिसणार नाही. सगळे रस्त्यावर उतरतील. तुम्हाला कळतच नाही तर सरकार चालवता कशाला?, असेही जरांगे पाटील म्हणाले.